बहुजननामा ऑनलाईन: कोरोना संसर्गाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी टाळेबंदी काळात पाच महिन्यांपासून बंद असलेली बस सेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र, विश्रांतीच्या कालावधीनंतर धावू लागलेल्या बसचे ब्रेकडाऊन वाढत असल्याने आता त्याची जबाबदारी निश्चित करुन संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) घेतला आहे. तथापि, ताफ्यात असलेल्या अनेक जुन्या बसेस बंद पडत असून, या बसच्या ब्रेकडाऊन नंतर नेमकी चूक कोणाची, हे शोधणार कसे असा सवाल विचारला जात आहे.
गेल्या पाच महिन्यांपासून बस जागेवरच उभ्या असून, त्यांची देखभाल आणि दुरुस्तीची कामे केल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. मात्र, बस सेवा सुरळीत झाल्याच्या पहिल्या पाच दिवसात १६४ बसेस मार्गावर बंद पडल्या. सध्या दररोज १९० मार्गावर सुमारे ४२५ बस सोडण्याचे नियोजन सुरु आहे. त्यातील दररोज किमान ३० बस बंद पडत आहेत. कमी बस असून सुद्धा ब्रेकडाऊन होत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेतली आहे. टाळेबंदीपूर्वी दिवसाला किमान १५० बस मार्गावर बंद पडत होत्या.
तथापि, आगारातील वर्क शॉप कर्मचारी, चालक व अधिकाऱ्यांवर ब्रेकडाऊन रोखण्यासाठी जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. त्यातील जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सहव्यवस्थापकीय चेतना केरुरे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सोमवार पासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं माहिती अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, ब्रेकडाऊन रोखण्यासाठी टाळेबंदी पूर्वी अनेक प्रयत्न करण्यात आलेले. पण त्यात यश प्राप्त नाही झालं. सध्या मार्गस्थ होणाऱ्या या बसेस १० ते १२ वर्ष जुन्या असून कितीही दंडात्मक कारवाई केली तरी ब्रेकडाऊन रोखता येणार नसल्याची चर्चा पीएमपी कर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहे.