नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – नागपूरात आज हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणात भाजपावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी सभागृहात भाजपाने केलेल्या विविध मुद्यांवर प्रत्युत्तर दिले. यामध्ये देशातील सर्व राज्यांमध्ये गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू करण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सर्व हिंदुत्व मान्य आहे का ? असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपाला विचारला आहे.
तसेच आपल्याला सावरकरांचं सर्व हिंदूत्व मान्य मान्य असेल तर गोवंश हत्याबंदीचा कायदा देशभरात लागू का झाला नाही असं म्हणत त्यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर व भाजपाचे केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांचे गोवांशबाबतीत केलेलं विधानांची देखील आठवण करुन दिली आहे. दिवंगत मनोहर पर्रिकर यांनी गोव्यात गोमांस कमी पडू देणार नाही असं विधान केलं होतं. तसेच किरेन रिजीजू यांनी केलेल्या मी गोमांस खाणार, कोणाला काय करायचंय करा या विधानांची आठवण करुन देत महाराष्ट्रात माता आणि बाजूला जाऊन खाता असं म्हणत भाजपाच्या गोवंश हत्याबंदीबाबतच्या दूतोंडी भूमिकेवर टीका केली आहे.
मात्र, ‘माफी मागायला माझे नाव काही राहुल सावरकर नाही’, असं म्हणत राहुल गांधींनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. त्यावरून, महाराष्ट्रातील राजकीय पक्षांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे. विशेषतः, भाजपाचे नेते या मुद्द्यावरून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सावरकर कोणाला शिकवताय तुम्हाला तरी ते कळलेत का ? असा सवाल देखील त्यांनी भाजपाला विचारला आहे.
Visit : bahujannama.com