बहुजननामा ऑनलाइन – आरेमधील मेट्रो 3 कारशेड आणि वृक्षतोडीस विरोध करणार्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, 10 महिने उलटले तरी गुन्हे कायम असल्याने ते मागे घेण्याच्या मागणीसाठी आंदोलकांनी काल गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली.
आरेमधील मेट्रो कारशेडच्या जागेवरील वृक्षतोडीचा निर्णय झाल्यावर 4 ऑक्टोबरच्या रात्रीच 2 हजार 646 झाडे तोडण्यात आली. त्यावेळी रात्रभर मोठया प्रमाणात आंदोलन झाले. यामध्ये 29 आंदोलकांना अटक झाली. त्यांना दोन दिवसांनी सशर्त जामीन मिळाला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर 29 नोव्हेंबरला कारशेडच्या कामास स्थगिती देत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, 10 महिने झाल्यानंतरदेखील आंदोलकांवरील गुन्हे अद्यापही कायम असल्यामुळे आंदोलकांनी काल मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. आव्हाड यांनी मुंबई पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला. त्यानंतर पुढील 10 दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण करून आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे, आरे कन्झव्र्हेशन ग्रुपच्या अम्रिता भट्टाचारजी यांनी सांगितले.