नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – विरोधकांच्या टीकेला आपण घाबरत नाही. सातत्याने माझ्यावर, देवेंद्र फडणवीसांवर आणि गिरीश महाजन यांच्यावर टीका केली जाते. मात्र, आम्ही कुठल्याही ट्रोलिंगला घाबरत नाहीत. कारण, तुम्ही दाखवतात की सत्ता नसली तरी आम्हा फरक पडला नाही. तुम्ही मजबूत आहात, म्हणून आम्ही घाबरत नाहीत, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना ठणकावलंय.
भाजपकडून राष्ट्रवादी आणि त्यानंतर शिवसेनेमध्ये दाखल झालेले माजी आमदार बाळासाहेब सानप हे पुन्हा स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा सुरू होती. नाशिक येथे त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब सानप यांचे स्वागत केले. यावेळी पाटील म्हणाले, भाजपत काम केलेला माणूस इतर पक्षात रमत नाहीत. तसेच, विरोधकांकडून होणार्या ट्रोलिंगबाबतही पाटील यांनी आपण घाबरत नाही, असे सांगितलं.
येत्या 4 महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेमध्ये केला. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं. यातच भाजपामध्ये 10 पेक्षा अधिक आमदार नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच मेगाभरती होणाराय, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी म्हटले होते. त्यामुळे, पाटील यांनी विरोधकांकडून मुद्दामहून अशी विधाने केली जात आहेत, असे सांगितले.
पाटील यांनी नाशिक इथल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं. तसेच, गेल्या वर्षभरापेक्षाही अधिक काळात कार्यकर्त्यांनी ज्या मेहनतीने काम ऊर्जेनं काम केलं ते कौतुकास्पद आहे, असे म्हटलंय. दरम्यानच्या काळात एकही नेता, कार्यकर्ता पक्ष सोडून गेला नाही, विरोधकांच्या गप्पा पोकळ ठरल्यात.
जाणून घ्या, बाळासाहेब सानप यांचा राजकीय प्रवास
सानप हे खरे तर मूळ काँग्रेस पक्षाचे आहेत.पण, भाजपमध्ये त्यांचे नशीब फळफळले अन् थेट महापौर झाले. त्यानंतर पक्षाला अधिक ’अच्छे दिन’ आल्यानंतर थेट आमदार झाले. गेल्या पंचवार्षिक कारकिर्दीत तर मंत्रिपदाच्या स्पर्धेत कायम राहिले. अर्थातच, ते तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती असल्याने त्यांच्या शब्दाला इतके वजन वाढले की, संघटनात्मक शिस्तीमध्ये ही संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकार्यांनी अनेकदा तडजोडी करून त्यांना सोयीची वाटतील, असे निर्णय घेतले.
2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शहराध्यक्ष म्हणून उमेदवारी वाटप त्यांच्या हाती होते. त्यानंतर महापालिका पूर्णत: त्यांच्या अधिपत्याखाली होती. मात्र, अशी सर्व अनुकूल स्थिती असतानाही त्यांच्याविषयी पक्षात रोष वाढत गेला. तसेच त्यांनी नंतर तर थेट तत्कालीन पालकमंत्री आणि तत्कालीन भाजप सरकारचे संकट मोचक गिरीश महाजन यांच्याशी वैमनस्य पत्करून संकट ओढवून घेतले.
त्याची परिणीती त्यांची उमेदवारी कापण्यात झाली. त्यामुळेच बाळासाहेब सानप यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी करावी लागली. त्यातही अपयश आल्यानंतर त्यावेळी शिवसेनेने त्यांना चुचकारले अन् थेट शिवसेनेत ते दाखल झाले.