पोलीसनामा ऑनलाइन टीम – एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने जोरदार पुनरागमन करत २-१ अशा फरकाने विजय मिळवला. मालिकेतील विजयाबरोबरच कर्णधार विराट कोहलीच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. विराट हा ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये मात देणारा भारताचा आणि आशियामधील पहिला कर्णधार ठरला आहे.
२०१८-१९ मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने
ऑस्ट्रेलियाला २-१ ने पराभूत केले होते. त्याच दौऱ्यात एकदिवसीय मालिकेमध्येही भारताने ऑस्ट्रेलियाला २-१ ने पराभवाचा धक्का दिला होता. तर यावर्षी टी-२० मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला २-१ अशा फरकाने नमवले. गतवर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने टी-२० मालिका बरोबरीत सोडवली होती, तर यावेळी मालिकेत विजय मिळवला आहे.
याआधी धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाला टी-२० मालिकेत ३-० अशा फरकाने पराभूत केले होते, तर २००८ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला तिरंगी मालिकेत पराभूत केले होते. मात्र, धोनीला ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकता आली नव्हती. २०११-१२ च्या दौऱ्यात तसेच २०१४-१५ च्या दौऱ्यात धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले होते. परंतु २००८ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २००८ मध्ये जिंकलेली तिरंगी मालिका हा भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात मिळवलेला पहिला विजय होता.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात तिन्ही प्रकारांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. मात्र पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश या अन्य आशियाई संघांना ऑस्ट्रेलियात अद्याप कसोटी मालिका विजय मिळवता आलेला नाही.