बहुजननामा ऑनलाईन टीम : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे २९ मुख्यमंत्रीम्हणून शिवाजी पार्कवर शपथ घेतली. यानंतर गेल्या महिन्यांपासून चालू असलेल्या नाट्यमय घडामोडींना पुर्णविराम मिळाला. दरम्यान शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर जोरदार हल्ला चढविला. या अग्रलेखामध्ये पाच वर्ष फडणवीस सरकारने कारभार करताना राज्यावर पाच लाख कोटींचे कर्ज केल्याचा आरोप करण्यात आला आहे. फडणवीस यांच्यावर आरोप करण्यात आले तरी, केंद्रातील मोदी सरकारचे मात्र यामध्ये कौतुक करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी भाऊ आहेत. केंद्र सरकारने राज्य सरकारला मदत करावी कारण मोदी हे देशाचे नेते आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारला सोबतीने चालायला हवे.
शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्या महाआघाडीचे सरकार कसे चालणार असा प्रश्न विचारला जात आहे. हे सरकार फार काळ टिकणार नाही असे विरोधकांचे म्हणणे आहे. याची भीतीही शिवसेनेने अग्रलेखातून व्यक्त केली आहे. महाराष्ट्र जनतेने जो निर्णय दिला आहे याचा केंद्राने आदर करावा. सरकार डळमळीत करण्याचा प्रयत्न होणार नाही याची काळजी घ्यावी. भगव्या ध्वजाशी वैर घेऊ नका. वैर घ्याल तर स्वतःचे नुकसान करुन घ्याल असा इशारा अग्रलेखातून सेनेने दिला आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मराठी जनता दिल्लीशी झुंजली. संघर्ष केला. संघर्ष आणि लढे आमच्या पाचवीलाच पुजले आहेत. दिल्ली देशाची राजधानी जरूर आहे, पण महाराष्ट्रही दिल्लीश्वराचा गुलाम नाही हा बाणा दाखविणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा बाणा आणि सरकारचा कणा ताठ राहील याची खात्री बाळगायला हरकत नाही.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार हे सत्य व न्यायाच्या सर्व कसोटय़ांवर उतरून स्थिरस्थावर होईल. पाच वर्षांत पाच लाख कोटींचे कर्ज राज्यावर लादले व फडणवीस सरकार गेले. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांनी जे संकल्प योजले आहेत त्यावर वेगाने, पण सावधपणे पावले टाकावी लागतील. पंतप्रधान मोदी यांनी नव्या सरकारला व मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने गतिमान विकास घडवावा, असे आमच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
केंद्राची भूमिका
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्रालाच पुढे यावे लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप-शिवसेनचे बिनसले आहे. पण मोदी आणि ठाकरे यांच्यातील नाते चांगले आहे. त्यामुळे लहान भावाला पंतप्रधान मोदींनी साथ देण्याची त्यांची जबाबदारी आहे. पंतप्रधान हे देशाचे नेते आहे त्यामुळे त्यांच्या सरकारविषयी मनात राग का ठेवायचा ? महाराष्ट्र म्हणजे चालता बोलता पुरुषार्थ! हा पुरुषार्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून मातीच्या कणाकणात दिसतो. स्वराज्यनिर्मितीसाठी शस्त्र व सुराज्याचा साक्षात्कार प्रत्येकास हमखास घडविणारे राज्यकारभाराचे आदर्श शास्त्र यशस्वीरीतीने हाताळणारे छत्रपती शिवाजीराजांसारखे साहसी पुरुष म्हणजे साक्षात परमेश्वरी शक्तीचाच अवतार होय. स्वराज्य स्थापनेच्या आड त्यांनी कळीकाळालाही येऊ दिले नाही. गळय़ातील ताईतही जरासा वाकडा वागला तर त्याची काडीमात्रही गय न करता दुर्गुण त्यांनी जेथल्या तेथे ठेचून काढले. हे राज्य जनतेचे आहे व ते 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रास छत्रपती शिवरायांनी जे दिले त्यात स्वाभिमान महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र दिल्लीस सर्वाधिक पैसा मिळवून देतो. देशाचे अर्थकारण मुंबईवर चालले आहे. देशाला सर्वाधिक रोजगार मुंबईसारखी शहरे देत आहेत. देशाच्या सीमांवर महाराष्ट्राचे जवान शहीद होत आहेत. देशाच्या सीमांचे रक्षण हे तर महाराष्ट्राचे पिढीजात कर्तव्यच आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर आता अन्याय होणार नाही व सन्मान राखला जाईल याची काळजी नव्या मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागेल. दिल्लीच्या दरबारात महाराष्ट्र चौथ्या-पाचव्या रांगेत उभा राहणार नाहीच, तर अग्रभागी राहून तो कर्तृत्व गाजवील असे परंपरा सांगत आहे. याच परंपरेचा भगवा ध्वज महाराष्ट्राच्या विधानसभेवर, मंत्रालयावर फडकला आहे. भगव्या ध्वजाशी वैर घेऊ नका. वैर घ्याल तर स्वतःचेच नुकसान करून घ्याल. महाराष्ट्रात सुराज्याचा उत्सव सुरू झाला आहे. तुम्हीही सामील व्हा…
Visit : bahujannama.com