बहुजननामा ऑनलाईन – “जेव्हा तुमचे सरकार इतके चांगले काम करीत आहे, तेव्हा लोकसभा निवडणुकीत पक्षाला जागा का जिंकता आल्या नाहीत ?” असा प्रश्न कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्यातील मुख्यमंत्र्यांना विचारला. लोकसभा निवडणूकीत झालेल्या पराभवाचे दुःख अजुनही कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधीना सहन करावे लागत आहे.
सोनिया गांधींनी शुक्रवारी (ता.१३) दिल्लीत कॉंग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली, ज्यात सर्व मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यांच्या कामकाजाचा अहवाल कॉंग्रेस अध्यक्षांना दिला. पण जेव्हा कमलनाथ आणि अशोक गहलोत हे राज्यांचे मुख्यमंत्री सोनिया गांधीना त्यांच्या राज्यांच्या कल्याणकारी धोरणांबद्दल सांगत होते, तेव्हा लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधींनी जागा कमी मिळवण्याविषयी विचारले. राज्यातील मुख्यमंत्र्यांना त्यांनी “तुमचे सरकार चांगले काम करीत असताना लोकसभा निवडणुकीत पक्षाला जागा का जिंकता आल्या नाहीत ?” असा प्रश्न विचारला. खरेतर या दोन राज्यात लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला फक्त एकच जागा जिंकता आली. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मुलगा छिंदवाड्यातून लोकसभा निवडणुकीत जिंकला. तर राजस्थानमध्ये कॉंग्रेसला एकही जागा मिळविता आली नाही.
सोनिया गांधी अध्यक्ष झाल्यानंतर दिल्लीत पक्षाची प्रमुख बैठक पहिल्यांदाच बोलावण्यात आली होती. या बैठकीत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पुडुचेरीचे मुख्यमंत्री नारायण सामी यांचा समावेश होता. सरकार आणि संघटना यांच्यात ताळमेळ कसा निर्माण करावा. पक्षाने जाहीरनाम्यात जे आश्वासन दिले होते त्यांची अंमलबजावणी केली जावी, हे या बैठकीचे उद्दीष्ट होते. जेव्हा देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या तेव्हा राहुल गांधी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधींनी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यानंतर १० ऑगस्टला सोनिया गांधी यांनी पुन्हा एकदा कॉंग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.