नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकाराच्या विविध खात्यांमध्ये तब्बल ६लाख ८३हजार पदे रिक्त असल्याची माहिती बुधवारी लोकसभेत देण्यात आली आहे. निवृत्ती, राजीनामा, मृत्यू, पदोन्नती, यांमुळे ही पदे रिक्त झाली असल्याची माहीती आहे. राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबत सांगितले की, केंद्र सरकारमध्ये एकूण ३८ लाख २ हजार ७७९ मंजूर पदे असून, त्यापैकी ३१ लाख १८ हजार ९५६ पदांवर अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत. १ मार्च, २0१८ रोजी ६ लाख ८३ हजार ८२३ पदे रिकामी होती.
कोणत्या विभागात किती जागा ?
रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड – १ लाख १६ हजार ३९१ पदे-
स्टाफ सिलेक्शन बोर्ड-१३ हजार ९९५
केंद्रीय लोकसेवा आयोग-४,३९९
पोस्टल सर्व्हिस बोर्ड आणि संरक्षण मंत्रालय- ३ लाख १0 हजार ८३२
त्यात नागरी संरक्षण-२७ हजार ६५२
पदे मुदतीत भरण्याच्या सूचना
सर्व खात्यांना व मंत्रालयांना रिक्त पदे ठरवून दिलेल्या मुदतीत भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसे करणे शक्य व्हावे, यासाठी उमेदवारांच्या ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत असून, अराजपत्रित पदांसाठीच्या मुलाखती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच जी तात्पुरती पदे आहेत, ती ताबडतोब भरावीत आणि त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांकडून काही गुन्हे घडले आहेत का वा त्यांची पार्श्वभूमी वादग्रस्त आहे का, हे तपासून घ्यावे, अशा सूचना दिल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले.