बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बीसीसीआय (BCCI) ची फिटनेस टेस्ट पुन्हा एकदा चर्चेत येऊ शकते कारण सहा भारतीय क्रिकेटपटू त्यात अपयशी ठरले आहेत. सर्व खेळाडू आयपीएलचे स्टार क्रिकेटर मानले जातात, जे स्वतःच्या बळावर सामना फिरवण्याची ताकद ठेवतात. बीसीसीआयच्या प्रमुख सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यष्टीरक्षक संजू सॅमसन, ईशान किशन, मधल्या फळीतील फलंदाज नितीश राणा, लेगस्पिनर अष्टपैलू राहुल तेवतिया, वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कॉल आणि जयदेव उनाडकट हे टेस्टमध्ये उत्तीर्ण होऊ शकलेले नाहीत.
बीसीसीआयची नवीन ‘2 किमी रेस’ फिटनेस टेस्ट या आठवड्यात बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अॅकॅडमी येथे झाली. TOI ला सूत्रांनी सांगितले की, ही एक नवीन प्रकारची फिटनेस चाचणी असल्याने काही काळानंतर प्रत्येकाला दुसरी संधी दिली जाईल. जर हे खेळाडू त्या टेस्टमध्ये देखील पास होऊ शकले नाहीत तर इंग्लंडविरुद्ध टी-20, वन-डे मालिकेत निवड होणे कठीण होईल.
2018 मध्ये संजू सॅमसन, मोहम्मद शमी आणि अंबाती रायडू यो-यो टेस्टमध्ये अपयशी ठरले होते, त्यानंतर त्यांना इंग्लंड दौर्यासाठी छोट्या फॉरमॅटच्या संघात स्थान मिळाले नव्हते. संजू सॅमसन अलीकडेच ऑस्ट्रेलियामध्ये गेलेल्या भारतीय टी-20 संघात सहभागी होता, या खेळाडूला संधी मिळाली, पण केरळचा हा यष्टिरक्षक फलंदाज साजेशी खेळी करण्यास अपयशी ठरला.
माध्यमांच्या वृत्तानुसार, त्या सर्व 20 खेळाडूंच्या टेस्ट झाल्या, ज्यांना इंग्लंडविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसह या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-20 विश्वचषक संभाव्यतेमध्ये गणले जाते. या विशेष फिटनेस प्रोग्राममध्ये 2 किमी धावण्याच्या चाचणीसह यो-यो चाचणीचा देखील समावेश आहे. या टेस्टमध्ये फलंदाज, यष्टीरक्षक आणि फिरकी गोलंदाजांना 8 मिनिट 30 सेकंदाच्या आत 2 किमी धावणे आवश्यक असते. तर वेगवान गोलंदाजाला 8 मिनिट 15 सेकंदात धाव पूर्ण करणे आवश्यक असते. दरम्यान या चाचणीत सहा खेळाडू अपयशी ठरले तर बाकीच्यांनी कसे बसे अंतर पार केले.