पुणे – देशातील तसेच राज्यातील परिस्थिती पाहता २०१९ साली नरेंद्र मोदीच पंतप्रधान असतील असे वक्तव्य आज (गुरुवार) पुणे येथे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. नरेंद्र मोदी हे आयपीएल मधल्या टीमचे कॅप्टन आणि मी त्यांच्या संघातला चांगला बॅटमॅन असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सेना भाजप युती बाबत लवकरच बोलणी होऊन उद्धवजींची नाराजी दूर होऊन ते भाजप सोबत येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
रामदास आठवले आज पुणे येथे आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते . आठवले म्हणाले काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी अनेक भाषणात भाजप सरकार हे दलित विरोधी आहे तसेच ते कायम मोदी विरोधी भाषण करतात. त्यांच्या भाषणाचा काही फायदा होणार नसून 2019 साली भाजपची सत्ता येणार आहे.अशा शब्दात राहुल गांधीवर त्यांनी निशाणा साधला. पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी ‘आयपीएल’मधल्या टीमचे कॅप्टन आहेत तर मीही चांगला बॅट्समन आहे. यावेळी त्यांनी २०१९ मध्ये मोदी सरकार परत सत्तेत येईल,” असा विश्वास व्यक्त केला.
उद्धवजींची नाराजी दूर होईल-
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सुरुवातीपासून भाजप आणि शिवसेनेची युती असावी अशी इच्छा होती. मात्र काही दिवसापासून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे नाराज आहेत. त्यांच्या नाराजी बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली असून ते लवकरच दिल्लीत त्यांच्याशी बोलतील. उद्धव ठाकरे यांची नाराजी दुर होईल, आणि सेना युतीमध्ये सामील होईल असा आशावादही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
भिमा कोरेगाव घटनेमागील मुख्य सुत्रधार शोधावा –
कोरेगाव भिमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना जामीन मंजूर झाला आहे. त्या प्रश्नावर आठवले म्हणाले की, समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना न्यायालयाने आज जामीन दिला आहे. तर यापूर्वीच संभाजी भिडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत क्लीन चीट दिली आहे. ”न्यायालय आणि पोलिसांपुढे कोणीही मोठा नसून भिमा कोरेगाव घटनेमागील मुख्य सुत्रधार सापडला पाहिजे. तसेच संभाजी भिडे यांच्या बाबत पोलिसांनी गांभीर्याने तपास करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
युती झाल्यास मुंबई अन्यथा रामटेक मधून लढणार –
आगामी लोकसभा निवडणूक भाजप-सेना-रिपाई युती झाल्यास मुंबईतून लढणार अन्यथा नागपूरातील रामटेकमधून लढविणार असल्याचे रामदास आठवले यांनी सूचित केले आहे. आठवले लोकसभेसाठी विविध मतदार संघाची चाचपणी करत होते. त्यांनी केलेल्या या घोषणेमुळे सध्यातरी आठवले लोकसभा कोठून लढणार या चर्चेला पुर्ण विराम मिळाला आहे.
धनगरांना अगोदर मी न्याय दिला-
धनगर आरक्षणाबाबत आठवले म्हणाले, धनगरांना अनेक राज्यात ट्रायबल दर्जा दिला आहे. महाराष्ट्रातही मिळायला हवा. प्रकाश आंबेडकर यांनी आत्ता धनगर समाजाला न्याय द्यायची भूमिका मंडळी असली तरी मी तो अनेक वर्षांपूर्वी दिला आहे. आदिवासी समाजाचे आरक्षण वाढवून त्यात धनगर समाजाला समाविष्ट करावे असे ते यावेळी म्हणाले.