नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २ एप्रिल २०१८ मध्ये झालेल्या भारत बंद दरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्या, अन्यथा राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला दिलेल्या पाठिंब्याचा पुनर्विचार करावा लागेल असा इशारा बसपा प्रमुख मायावती यांनी काँग्रेसला दिला आहे.
२ एप्रिल २०१८ मध्ये अनुसूचित जाती-जमाती अधिनियमातील दुरूस्ती विरोधात भारत बंद करण्यात आले होते. बंददरम्यान काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते गुन्हे मागे घेण्यात यावेत म्हणून बसपा प्रमुख मायावती यांनी मागणी केली आहे. मात्र जर गुन्हे मागे घेतले नाही तर राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला दिलेल्या पाठिंब्याचा पुनर्विचार करावा लागेल असा इशाराही मायावती यांनी काँग्रेसला दिला.
इतकेच नव्हे तर बसपा प्रमुख मायावती यांनी भाजपाच्या काळात राजकीय हेतूने आणि जातीयवादातून निर्दोष लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आले होते, असा आरोपही केला. याचबरोबर बसपाने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सरकारने शेतकरी आणि बेरोजगांसाठी तात्काळ पाऊल उचलण्याचा सल्ला दिला आहे
विशेष म्हणजे, मध्य प्रदेशमध्ये बदलत्या समीकरणांदरम्यान सपा आणि बसपा महत्वाच्या भूमिकेत आले आहेत. जागा वाटपावर सहमती न झाल्याने निवडणुकीपूर्वी काँग्रेसने बसपाबरोबर आघाडी करण्यास नकार दिला होता. इतकेच नव्हे तर बसपाने विधानसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तिनही राज्यात निवडणूक लढवली होती. तिन्ही राज्यांमध्ये त्यांना क्रमश: २, २ आणि ६ जागा मिळाल्या होत्या. मध्य प्रदेशमध्ये बहुमतापासून अवघ्या २ जागा कमी पडलेल्या काँग्रेसला त्यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे १५ वर्षांनंतर काँग्रेसची सत्ता आली.