मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाबाबत मुंबई हायकोर्टात महत्वाची आजपासून सुनावणी असताना, याच पार्श्वभूमीवर काल (5 फेब्रुवारी) मुंबईत मराठा नेत्यांची एक गुप्त बैठक झाली. आरक्षण टिकलं तर हे टिकाऊ आरक्षण, असा त्याचा उल्लेख करून जल्लोष केला जाणार आहे. नाही टिकलं तर रस्तावर उतरण्यासाठीची तयारी करण्याची रणनीती या बैठकीत ठरवण्यात आली आहे.
ही बैठक मुंबई सेन्ट्रल येथील मराठा मंदिर संस्थेच्या बाबासाहेब गावडे कॉलेजच्या सभागृहात झाली. ही बैठक मराठा महासंघाचे अध्यक्ष श्रीकांत पवार , संघाचे नेते वीरेंद्र पवार , कोल्हापूर येथील मराठा नेते आणि याचिकाकर्ते दिलीप पाटील, साताऱ्याचे बापू क्षीरसागर, नाशिकचे तुषार जगताप, सोलापूरचे रवी मोहिते, सांगलीचे प्रशांत भोसले, लातूरचे व्यंकट शिंदे आदी मान्यवरांसह मुंबईतील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत सुनावणीची परिस्थती पाहून पुढची रणनीती ठरवण्यात आली आहे.
राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण जाहीर केलं. त्या विरोधात दोन जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. पहिली याचिका . अॅड.गुणरत्न सदावर्ते यांची, तर दुसरी याचिका संजित शुक्ला यांनी दाखल केली. मराठा समाजाला जे आरक्षण देण्यात आलंय ते घटनेनुसार नाही. हे आरक्षण अतिरिक्त आरक्षण आहे. यामुळे हे आरक्षण रद्द करावं, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. तर या प्रकरणात 27 जणांनी इंटर्व्हेन्शन याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी याचिका दाखल केली होती. ती त्यांनी मागे घेतली आहे.