बहुजननामा ऑनलाईन टीम – जेष्ठ साहित्यिकउत्तम बंडू तुपे (वय-78) यांचे आज सकाळी आठच्या सुमारास पुण्यात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. ‘झुलवा’कार म्हणून साहित्यविश्वात प्रसिद्ध झालेले उत्तम बंडू तुपे यांचा जन्म 1 जानेवारी 1942 रोजी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याच्या ‘एनकूळ’ या गावी झाला होता.
उत्तम बंडू तुपे यांची ‘झुलवा’ ही कादंबरी विशेष गाजली. यामुळेच त्यांना झुलवाकार नावाने ओळखले जात होते. याचबरोबर कळा, कळाशी, नाक्षारी, भस्म, चिपाड, इंजाल, झावळ आणि माती या कादंबर्या देखील विशेष गाजल्या आहेत. तर ‘आंदण’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विशेष पुरस्कार मिळाला आहे. त्याच बरोबर ‘काट्यावरची पोट’ या आत्मकथेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमय पुरस्कार मिळाला. त्यांचा जीवन प्रवास अखेर पर्यंत खडतर राहिला. मागील अनेक महिन्यापासून ते आजारी होते. ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांनी तुपे यांच्या ‘झुलवा’ कादंबरीवर आधारित नाटक रंगभूमीवर आणले होते. त्यात अभिनेते सयाजी शिंदे आणि सुकन्या कुलकर्णी-मोने यांनी भूमिका केल्या होत्या. 1997 साली जळगावमध्ये भरलेल्या कामगार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना अण्णा भाऊ साठे पुरस्कार, तसेच त्यांना राज्य पुरस्कार मिळाला होता.