मुंबईः बहुजननामा ऑनलाईन – मुंबईत सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे लोकलबाबत नेमका काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. पण रुग्णसंख्या वाढत राहिल्यास काही कडक निर्णय घेतले जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी तसे संकेत दिले आहेत. आपण मुंबईच्या लोकलसाठी 15 दिवसांचा कालावधी निरीक्षणासाठी ठेवला आहे. हा कालावधी येत्या 21 फेब्रुवारीला संपणार आहे. त्यानंतर पुन्हा रुग्णसंख्येचा आढावा घेऊन त्यानुसारच लोकलबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.
अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की, मुंबई महापालिका आणि आजूबाजूच्या महापालिका विचारात घेऊन त्यासंदर्भातील शिफारस व माहिती राज्य सरकारला उपलब्ध करुन दिली जाईल. त्यानंतरच पुढील निर्णय होईल. तसेच मुंबईची लोकल सुरू झाली म्हणून रुग्ण वाढले हे एकमेव कारण आहे असे म्हणता येणार नाही. हवाई वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. मोजकी आंतरराष्ट्रीय विमानसेवा देखील सुरू होती, पण त्यांची संख्या आता वाढलेली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुणीही मास्क घालत नाही हे अत्यंत गंभीर आहे. याची आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशाराच पवार यांनी दिला आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असून याबाबत चर्चा केली जाणार असल्याचे सांगत पवार यांनी राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले जाण्यासंदर्भातील सुतोवाच केले आहे.