बहुजननामा ऑनलाईन
अनलॉक 5 नंतरही भाविकांना मंदिरं उघडण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे असं दिसत आहे. कारण दसऱ्या पर्यंत तरी मंदिरांची दारं उघडण्याची शक्यता धूसर झाली आहे आणि यामुळं भाविकांमध्ये तीव्र नाराजी आणि निराशा दिसत आहे. अनेकांना अशी आशा होती की, लॉकडाऊन 5 मध्ये मंदिरांबद्दल निर्णय होईल. रेस्टॉरंट, बार, हॉटेल उघडायला परवानगी देणाऱ्या ठाकरे सरकारनं मंदिराची दारं मात्र बंदच ठेवली आहेत ज्यामुळं भाविक आणि वारकरी संप्रदायात मोठी नाराजी दिसत आहे.
अनलॉक 5 मध्ये हॉटेल आणि इतर व्यवसायांना ज्याप्रमाणे अटी घातल्या तशाच अटी मंदिरातही घालून दारे उघडावीत अशी मागणी आता भाविक करत आहेत. कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील सर्वच धर्माच्या नागरिकांनी धार्मिक स्थळांबाबत खूप सकारात्मक भूमिक घेत सरकारला पाठिंबा दिला होता. आता मात्र धार्मिक स्थळांची दारं बंद होऊन 6 महिने उलटूनही शासन ही दारं उडण्यास तयार नसल्यानं भाविकांच्या मनात तीव्र नाराजी आहे.
सध्या पंढरपूरमध्ये वारकरी संप्रदायात महत्त्वाचा मानला जाणारा आणि 3 वर्षातून येणारा अधिक महिना सुरू आहे. राज्यभरातून रोज हजारो भाविक पंढरपुरात येऊन नामदेव पायरी आणि कळसाचं बाहेरून दर्शन घेत आहेत आणि चंद्रभागेच्या स्नानावर समाधान मानीत आहेत. कोरोनाचे वाढते संकट पाहता शासनाची मंदिरं उघडण्याची मानसिकता नसल्याचं पाहून मुंबई उच्च न्यायालयानंही एका जनहित याचिकेवर मंदिरं उघडण्याबाबत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.
संकटकाळी देवाच्या दर्शनानं सकारात्मक ऊर्जा तयार होईल जी या रोगाशी लढण्यास मदत करेल अशी भाविकांची भावना आहे. अधिक महिना संपल्यानंतर अश्विन महिन्यात नवरात्र येणार असून या काळात मंदिरं उघडण्यास राज्यातील काही मोठ्या देवस्थानाकडून नकारात्मक भूमिका समोर आल्यानं दसऱ्यापर्यंत मंदिरं उघडण्याची शक्यता कमी दिसत आहे.