बीड : बहुजननामा ऑनलाइन – शेतीच्या वादातून तिघांचा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. ही घटना पिंपरगव्हाण रोड परिसरात आज (शनिवार) सकाळी घडली. या घटनेमुळे बीड जिल्हा हादरुन गेला असून परिसरात तणावाचे वातावरण आहे. किरण काशीनाथ पवणे, प्रकाश काशीनाथ पवणे, दिलीप काशीनाथ पवणे अशी मयतांची नावे आहेत. हे तिघेही वासनवाडी येथील रहिवाशी असून, त्यांची पिंपरगव्हाण रोडवर शेती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किसन पवणे व काशीनाथ पवणे या भावांमध्ये शेतीचा वाद सुरु होता. शुक्रवारी रात्री अॅड. कल्पेश किसन पवणे आणि डॉ. सचिन किसन पवणे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची फिर्याद बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. त्यामुळे हा पूर्व नियोजित कट असल्याचे बोलले जात आहे. या दोघांवर खून केल्याचा संशय व्यक्त केला जात असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. या दोघांवर जिल्हा रुग्णालयात पोलीस बंदोबस्तात उपचार सुरु आहेत.
सकाळी दहाच्या सुमारास जखमी झालेल्या एकाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना पोलिसांच्या गाडीतून रुग्णालयात नेण्यात आले. तर मृत झालेल्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले. या घटनेमध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळाला भेट दिली. या घटनेमुळे गावामध्ये मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, जखमी झालेल्या व्यक्तींना भेटण्यासाठी पोलिसांनी मनाई केली आहे.