बहुजननामा ऑनलाइन टीम – केंद्र सरकारनं लागू केलेल्या कृषी कायद्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एक प्रकार मध्य प्रदेशात समोर आला आहे.(defrauding crores of farmers) शेतकऱ्यांची तब्बल 2 कोटींची फसवणूक करत ट्रेडर्स फरार झाले आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांसमोर एक नवा प्रश्न उभा राहिला आहे.
मध्य प्रदेशच्या हरदा जिल्ह्यातील एका कंपनीनं जवळपास 2 डझन शेतकऱ्यांसोबत पिकांसाठी करार केला होता. परंतु वेळ आल्यावर मात्र त्यांना मोबदलाच मिळाला नाही. मोबदला न देताच कंपनी गायब झाली. 2 डझन शेतकऱ्यांनी 2 कोटींचा करार केला होता.
खोजा ट्रेडर्सचे मालक असलेल्या दोन भावांनी शेतकऱ्यांकडून उत्पादन घेतलं मात्र कंपनीकडून दिले गेलेले चेक मात्र बाऊंस झाले. हरदा गावातील 22 शेतकऱ्यांनी हा करारा केला होता. माहिती घेतल्यानंतर असं समोर आलं की, कंपनीनं 3 महिन्यातचं रजिस्ट्रेशन संपुष्टात आणलं होतं. खातेगाव पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. इतकंच नाही तर जिल्हाधिकाऱ्यांना लिखित स्वरूपात तक्रारही देण्यात आली आहे.
खोजा ट्रेडर्सकडून बाजार समितीपेक्षा 700 रुपये अधिक दर देण्याचं कबुल करण्यात आलं होतं. या प्रकरणानंतर आता कृषी कायद्यातील तरतुदी अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत. नव्या कृषी कायद्यान्वये शेतकरी-कंपनीचा वाद उपविभागीय दंडाधिकाऱ्यांसमोर सोडवला जाऊ शकतो.
दिल्लीतील आंदोनकर्त्या शेतकऱ्यांकडून, कायद्यातील खासगी ट्रेडर्सच्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आणखीच मजबूत व्हावी तसंत कोणताही वाद निर्माण झाल्यास स्थानिक न्यायालयात जाण्याचा रस्ता मोकळा असावा या मुद्द्यांचीही मागणी केली जात आहे.