बहुजननामा ऑनलाइन टीम – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील तणाव गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. पण याचा फटका खुद्द राज्यपाल महोदयांना बसला. राज्यपाल कोश्यारी ज्या सरकारी विमानातून जाणार होते, त्या विमानाच्या उड्डाणास ठाकरे सरकारने परवानगीच दिली नाही. त्यामुळे राज्यपालांना अखेर खाली उतरावे लागले.
राज्यपाल कोश्यारी हे राज्य सरकारच्या एका विमानाने देहरादून येथे जाणार होते. पण त्या सरकारी चार्टर प्लॅनमध्ये जवळपास 20 मिनिटे बसून होते. मात्र, या विमानाच्या उड्डाणाला उद्धव ठाकरे यांच्या सरकारने परवानगी दिली नाही. त्यामुळे अखेर राज्यपाल महोदयांना विमानातून उतरावे लागले आणि एका खाजगी विमानाचे तिकिट घ्यावे लागले. त्यानंतर ते देहरादूनला जाण्यासाठी रवाना झाले.
आठवडाभरापूर्वीच दिली होती प्रवासाची माहिती
याबाबत सूत्रांनी माहिती दिली. त्यामध्ये सांगितले, की एका आठवड्यापूर्वी राज्यपाल भवनकडून राज्यपाल कोश्यारी यांच्या देहरादून प्रवासासाठी राज्य सरकारला माहिती दिली होती. मात्र, राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिले गेले नाही.
राज्यपाल अर्धा तास होते बसून
विमानातून उतरल्यानंतर राज्यपाल कोश्यारी व्हीआयपी झोनमध्ये जाऊन बसले. अर्धा तास तिथं बसल्यानंतरही त्यादरम्यान त्यांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणताही फोन किंवा माहिती घेतली गेली नाही. त्यामुळे अखेर त्यांनी खाजगी विमानाचा पर्याय घेण्याचे ठरविले. त्यानंतर त्यांनी SpiceJet चे दुपारी 12.15 च्या मुंबई ते देहरादून विमानात बसून प्रवास केला.