बहुजननामा ऑनलाईन– राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोरोना संसर्गा संदर्भात गंभीर नसून खासगी रुग्णालयांमध्ये भरमसाठ बिल आकारली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत बोलताना केला. ठाकरे सरकारचे निर्णय कागदावर आहेत त्यांची अंमलबजावणी होत नाही. गरीब रुग्णांनी काय करायचं, असा संतप्त सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, १० लाखांचं बिल देऊ शकणाऱ्या कोरोना रुग्णाला कुठेही बेड मिळतो. जो गरीब आहे त्याला मात्र मरायला सोडून दिल जात आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात कोरोना रुग्णांच्या मृत्युसंख्येत वाढ झाली असून, या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. कोरोनाच्या काळात आम्हाला टीका करायची नाही. पण सरकार काय करत आहे ते दिसतच नाही म्हणून बोलावं लागत असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
तसेच कोरोना बाबत आम्ही सरकारला काही सांगितलं. कोरोना दरम्यान आम्ही समजुतीने वागलो. सरकारला पत्र पाठवली. मात्र, आतापर्यंत एकाही पत्राला उत्तर देण्यात आलं नाही. आज ज्या प्रकारे कामकाज सुरु आहे त्यावरुन कोरोनाबाबत सरकार गंभीर नसल्याचं दिसून येत आहे. सभागृहातील सदस्यांना बोलायचं आहे. कोरोना पूर स्थितीवर चर्चा केली पाहिजे. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. पाच राज्यात ७० टक्के मृत्यू आहेत. तर तर त्या ७० टक्क्यांतील ५० टक्के मृत्यू हे महाराष्ट्रातील आहेत.
राज्यात नवे हॉटस्पॉट तयार होत आहेत. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. राज्यात भयावक परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतात महाराष्ट्र कायम एक नंबर होता. मात्र, तो कोरोनात व्हावा अशी आमची इच्छा नव्हती. पण आता महाराष्ट्राशी कोणसोबतच तुलना नसल्याचं, देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.