नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) घडली आहे. सीबीआयने छापेमारी दरम्यान 103 किलो ग्रॅम सोनं जप्त केलं होतं. या सोन्याची एकूण किंमत तब्बल 45 कोटी होती. मात्र, सीबीआयच्या ताब्यात (Custody) असेलेलं सोनं (Gold) हे आता अचानक गायब झालं आहे. कोर्टाने या प्रकरणात तामिळनाडू सीबी-सीआयडीला (CB-CID) चौकशीचे आदेश दिले आहेत.
काय आहे प्रकरण ?
सीबीआयच्या टीमनं 2012 मध्ये चेन्नईमधील सुराना कॉर्पोरेशन लिमिटेडच्या ऑफिसवर छापा टाकला होता. या कारवाईत सोन्याच्या विटा आणि दागिन्यांच्या स्वरुपात 400.5 किलो ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं होतं. हे सर्व सोनं सीबीआयच्या सेफ कस्टडीमध्ये ठेवण्यात आलं होतं. आता यामधील तब्बल 103 किलो ग्रॅम सोनं गायब झाल्याचे उघडकीस आले आहे.
सीबीआयचा काय आहे दावा ?
हे सोनं ज्या सेफ कस्टडीमध्ये ठेवण्यात आलं होतं त्याच्या 72 किल्ल्या चेन्नईच्या प्रिन्सिपल स्पेशल कोर्टाला देण्यात आल्या होत्या, असा दावा सीबीआयनं केला आहे. तसेच छापेमारीच्या दरम्यान सीबीआयनं सर्व सोनं एकत्र आणलं होतं. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि सुराना कॉर्फोरेशन यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी नेमण्यात आलेल्या लिक्विडेटरला हे सोनं सोपवताना त्याची विभागणी करण्यात आली होती. याच कारणामुळे सोन्याच्या वजनात आता फरक पडला असल्याचे स्पष्टीकरण सीबीआयने दिलं आहे.
सीबीआयचे युक्तीवाद कोर्टाने फेटाळले
सीबीआयचे हे सर्व युक्तीवाद मद्रास हायकोर्टाचे न्यायाधीश प्रकाश यांनी फेटाळले आहेत. या प्रकरणात एसपी रँकच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली सीबी-सीआयडी चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. या सर्व प्रकरणामुळे तपास यंत्रणांची प्रतिष्ठा कमी होत आहे, त्यामुळे सहा महिन्याच्या आत याचा तपास करावा, असे आदेश न्यायमुर्ती प्रकाश यांनी दिले आहेत.