नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेल्या नियमांचे पालन न केल्याचा ठपका ठेवत तबलिगी मरकझमध्ये सहभागी झालेल्या ३६ परदेशी नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या ३६ परदेशी आरोपींची नवी दिल्ली उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
२४ ऑगस्ट रोजी भारतीय दंड विधानाच्या कलम २६९ (संसर्ग काळात बेजबाबदारपणे वागणे), १८८ अन्वये (सरकारनं लागू केलेल्या आदेशांचं पालन न करणे) त्याचसोबत महामारी कायद्याच्या कलम ३ (नियमांचं उल्लंघन करणे) या आरोपांखाली १४ देशांच्या परदेशी नागरिकांवर गुन्हे नोंद केले होते. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ नुसार त्यांच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आलेले. मुख्य महानगर दंडाधिकारी अरुण गर्ग यांच्या न्यायालयासमोर ही सुनावणी पार पडली. त्यांनी या आरोपींविरोधात लावण्यात आलेले सगळे आरोप फेटाळत या आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
न्यायालयाने दिल्ली पोलिसांना खडसावत आरोप सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावे देता आले नसल्याचे सांगितले. मरकझ परिसरात आरोपींची उपस्थिती सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश आले असल्याचे सुनावणीवेळी न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्याचसोबत साक्षीदारांच्या निवेदनातही विरोधाभास आढळला.