बारामती : Sunetra Ajit Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Lok Sabha) सुनेत्रा पवार यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर (Rajya Sabha) घेऊन मंत्रिपद देण्याची मागणी ठराव घेऊन पक्षाच्या बैठकीत करण्यात आली होती.
दरम्यानच्या काळात छगन भुजबळांचीही (Chhagan Bhujbal) नाराजी बाहेर आल्याचे पाहायला मिळाले. मात्र भुजबळांनीच सुनेत्रा पवार यांची राज्यसभेची उमेदवारी घोषित करून आपण नाराज नसल्याचे स्पष्टीकरण दिले.
एकीकडे शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. लोकसभा निवडणुकीत म्हणावे असे यश प्राप्त झाले नाही. त्यामुळे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना ताकद देण्यासाठी अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे. जर सुनेत्रा पवारांना केंद्रात मंत्रिपद मिळाले तर त्याचा प्रभाव बारामती आणि एकूणच पुण्यात राहील असे म्हंटले जातेय.
शहर आणि तालुक्यात सर्व संस्थांवर वर्चस्व असताना सुनेत्रा पवार यांचा झालेला पराभव संस्थेचे प्रमुख, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या जिव्हारी लागला होता. सुनेत्रा पवार यांच्या पराभवानंतर अजित पवार गटात कमालीची शांतता होती.
मात्र, आज त्यांचा राज्यसभा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यसभा खासदारकीनंतर पवार यांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची चर्चा आहे. त्यामळे बारामतीत अजित पवार गटाला आणखी बळ मिळणार आहे.