जालना : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात आजपासून लसीकरणाच्या ड्राय रनला सुरुवात झाली. त्याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope)
जालन्यातील ड्राय रन सुरु असलेल्या केंद्राची पाहणी केली. त्यावेळी सीरमने तयार केलेली लस देण्यासाठी राज्य तयार आहे. ड्रग अॅथॉरिटी ऑफ इंडियाची (Drug Authority of India) परवानगी मिळाल्यानंतर प्रशासन लसीकरणासाठी सज्ज असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
टोपे म्हणाले, ‘लसीकरण केंद्राची रचना मतदान केंद्रासारखी असून, आपण मतदान केंद्रावर जातो तिथे आपली पहिली भेट पोलीस कर्मचाऱ्यांसोबत होते. लसीकरण केंद्रवार सुद्धा पोलीस असतील. ते ओळखपत्र तपासतील. लसीकरण केंद्रात प्रवेश करण्यासाठी ओळखपत्र अनिर्वाय असेल. त्यानंतर संबंधित व्यक्ती आयडेंडिफिकेशन रूममध्ये जाईल. तिथे शिक्षक अथवा शिक्षिका असतील ते मेसेज पाठवण्यात आलेला व्यक्ती केंद्रावर आला का, याची पडताळणी कोविन ऍपच्या मदतीने करतील.’
‘त्यानंतर ठराविक तापमानात ठेवण्यात आलेली लस प्रशिक्षित असलेल्या नर्स संबंधित व्यक्तीच्या दंडाला टोचतील. टोचल्यानंतर त्या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल. काही व्यक्तींना ताण-तणावाची समस्या असते. काही जण लगेच अस्वस्थ होतात. त्यामुळे त्यांना भोवळ येऊ शकते. असे काही घडल्यास लसीकरण केंद्रावर बेड, ऑक्सिजन पुरवठ्याची सुविधा असेल. लसीकरण झालेल्या व्यक्तीचे निरीक्षण करण्याचे काम अंगणवाडी आशा वर्कर्स करतील,’ असेही टोपे यांनी सांगितले.
दरम्यान, कोरोनाची लस टोचल्यानंतर पहिल्यासारखे बिनधास्त फिरता येईल, असा अनेकांचा गैरसमज झालेला आहे. त्याबाबत बोलताना टोपे म्हणाले, कोरोनाची लस घेतल्यानंतर निर्धास्तपणे फिरायला मोकळे, असे अनेकांना वाटत आहे. मात्र, कोरोनाची लस घेतल्यावर शरीरात रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी काही काळ जावा लागतो. यामुळे मास्क, सामाजिक अंतर पाळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.