बहुजननामा ऑनलाइन टीम – दिल्ली : वृत्तसंथा – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेतील चर्चेवेळी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तेव्हा शाह यांनी जम्मू काश्मीर मुद्द्यावर बोलताना म्हणाले, योग्य वेळी जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं. तर काश्मीर येथील जर शाळा जाळल्या गेल्या नसत्या तर काश्मीरमधील मुलं आज आयएएस आणि आयपीएस अधिकारी बनले असते. असे त्यांनी म्हटले.
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० यापूर्वी केंद्र सरकारनं हटवलं होतं. त्यानंतर लोकसभेत मांडण्यात आलेलं जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरूस्ती) विधेयक २०२१ लोकसभेत पारित करण्यात आलं. यावेळी लोकसभेतील चर्चेदरम्यान अमित शाह यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे. तसेच जम्मू काश्मीर आणि लेहच्या मुद्द्यावर राजकारण करण्याची गरज नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, काश्मीरी तरूणांना ऑल इंडिया कॅडरमध्ये येण्याचा अधिकार नाही का? जर शाळा जाळल्या गेल्या नसत्या तर काश्मीरमधील मुलं आज आयएएस आणि आयपीएस अधिकारी बनले असते, असं शाह यावेळी म्हणाले.
शाह पुढे म्हणाले की, डिसेंबर २०१८ मध्ये जम्मू काश्मीरमध्ये पंचायत निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये ७४ टक्के लोकांनी मतदान केलं. आता त्या ठिकाणी लोकांच्या मतांमधून सरपंच निवडला जाणार आहे. तसेच जम्मू काश्मीरच्या पंचायतींना आम्ही अधिकार दिले आहेत. त्यांना बजेट देण्यात आलं आहे. प्रशासनाचे २१ विषय हे पंचायतींकडे सोपवण्यात आले आहे. जवळपास १ हजार ५०० कोटी रूपये थेट बँक खात्यात जमा करून जम्मू काश्मीरमधील गावांच्या विकासाचा रस्ताही मोकळा केला आहे, असेही यावेळी अमित शाह यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कोणाच्या दबावाखाली इतके वर्ष कलम ३७० कायम ठेवण्यात आलं होतं? तुम्ही १७ महिन्यांचा हिशोब मागत आहात ७० वर्षांपर्यंत जेव्हा कलम ३७० लागू होतं तेव्हा का हिशोब मागत नव्हता? तात्पुरत्या स्वरूपातील कलम हटवण्यात आलं नाही कारण तुम्हाला मतांचं राजकारण करायचं होतं, असा आरोप त्यांनी केला. तर जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत २८ योजना पूर्ण करण्यात आल्या. आणि पंतप्रधानांनी जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याच्या दर्जा परत देणार असल्याचं आश्वासन दिले, मी जनतेला विश्वास देऊ इच्छितो की योग्य वेळ आल्यानंतर जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात येईल. असे अमित शाह यांनी म्हटले आहे.