बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे ज्येष्ठ नेते र.ग. कर्णिक यांचे (वय 91) शनिवारी (दि. 6) निधन झाले. वांद्रे येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कर्णिक यांच्या निधनानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी शोक व्यक करत, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचीही आठवण अनेकांनी शेअर केली आहे.
सन 1970 आणि 1977 मध्ये अनुक्रमे 37 व 54 दिवसांचे दोन मोठे कर्मचारी संप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. कर्णिक यांच्या नेतृत्वामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. खरोखरच ज्या काळात सोशल मिडिया नव्हता, इंटरनेट नव्हते, वाहतुकीची पुरेशी साधने नव्हती. हक्काबाबत जाणीव नव्हती, वेतन कमी, वरीष्ठांचा दरारा होता, अशा परिस्थितीतही कर्णिक यांनी संघटनेचे सारथ्य कुशलतेने होते.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे हृदयस्थान श्री. र. ग. कर्णिक यांची प्राणज्योत काही वेळापूर्वी मालवली. अत्यंत दुःखद असणारी ही बातमी मला आपल्यापर्यंत पोचवावी लागत आहे. मध्यवर्ती संघटनेच्या इतिहासात ज्यांचे नाव अमर राहील. त्यांनी आज आपल्या सर्वांचा निरोप घेतला आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कर्णिक साहेब, अमर रहे! अशी प्रतिक्रिया राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सरचिटणीसांनी दिली आहे.