पुरंदर : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना काळात लोक हतबल झाल्याचं पाहायला मिळतंय. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने आरोग्य सुविधा तोकड्या पडल्या आहेत. अशा काळात अनेकांनी मदतीचा हात पुढे केलाय. अशा लोकांमध्ये चर्चेत आहेत पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पिसर्वे गावचे सरपंच बाळासाहेब कोलते.कोरोना काळात ते लोकांची करत असलेली मदत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी माणूसकीचं दर्शन घडवलं आहे. अनेक लोकांसाठी ते देवदूत बनले आहेत. कोरोनाची लागण झालेली व्यक्ती दुर्दैवाने मृत्यू पावली तर त्यांना खांदा द्यायला देखील माणसं मिळेणाशी झाली आहेत. याला ग्रामीण भाग देखील अपवाद नाही. मात्र या अशा परिस्थितीत सरपंच बाळासाहेब कोलते स्वतःच ‘स्मशानातील देवदूत’ बनले आहेत. रात्र असो व दिवस कोरोनाने मृत्यू झाल्याचे कळाले की ते स्वतःआपल्या सहकाऱ्यांसोबत जाऊन नातेवाईकांची वाट न पाहता अंत्यविधी करीत आहेत.
गेल्या महिनाभरापासून पिसर्वे गावात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. याच काळात गावात एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला. आणि रात्री एक वाजता त्यांना बोलावणे आले. आता करायचे काय हा प्रश्न समोर उभा ठाकला. मृतदेहाला कोणीही हात लावायला पुढे येत नसल्याने स्वतः सरपंच बाळासाहेब कोलते यांनी पीपीई किट घालून स्वतः स्मशामभूमीत जाऊन अग्नी दिला. त्यांची ही सेवा गेल्या काही दिवसांपासून सुरू असून गेल्या पंधरा दिवसांपासून आजपर्यंत त्यांनी गावातील सहा मृतदेहांना ही स्मशान सेवा दिली आहे. ज्याला शक्य होईल त्याला ते मदत करीत आहेत.
नुकताच पीपीई किट घालून एकाचा त्यांनी अंत्यविधी केला. सरपंच कोलते यांना या कामात ग्रामपंचायत सदस्य महेश वाघमारे, पत्रकार संदिप बनसोडे, तेजस कोलते आदी ग्रामस्थांचे मोठे योगदान लाभले असल्याचे त्यांनी सांगितले.
”सध्याचा काळ खूपच कठीण आहे. घराशेजारचा माणूस मरण पावला तर लोक करोनाच्या भीतीने येत नाहीत. मात्र मी आणि माझे सहकारी मात्र त्याठिकाणी धावून जातो. कोरोना पाॅझिटिव्ह व्यक्तीचे निधन झाल्याचे कळाल्यानंतर तिथे जाऊन अंत्यविधीचे सामान खरेदी करण्यापासून ते लाकडे रचण्यापर्यंतची सगळी कामे करतो. त्यामुळे सर्वांनी आपल्या परिवाराची स्वतःची काळजी घेत जेवढी इतरांना मदत करता येईल तेवढी करावी असे सरपंच बाळासाहेब कोलते यांनी सांगितले.