मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे यांचे नाव मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात आले आहे. त्यावरून त्यांच्यावर कारवाईसह गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी वक्तव्य केले आहे. ‘या प्रकरणात समोर येणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव कितीही मोठं असले तरी त्याची बदली करा.’
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची महत्त्वाची बैठक पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. सचिन वाझे अटकेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, ही बैठक पूर्वनियोजित होती, असे सांगण्यात आले. तसेच गेल्या काही दिवसांपासून सचिन वाझे प्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया न देणाऱ्या शरद पवार यांनी आज यावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘सचिन वाझे प्रकरणात ज्यांची नावे समोर येतील त्यांची बदली करा. यात समोर येणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव कितीही मोठं असले तरी त्याची बदली करा’.
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही याप्रकरणी विधान केले. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. यावर सत्तेतील तिन्ही पक्षांचे एकमत आहे. एनआयए आणि एटीएसमार्फत या प्रकरणाचा तपास केला जात आहे. यामध्ये राज्य सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही. या प्रकरणी जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई व्हायला हवी.
अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर पाटील म्हणाले…
सचिन वाझे यांचे नाव याप्रकरणात आल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणी केली जात आहे. त्यावर ते म्हणाले, गृहमंत्र्यांनी त्या-त्या वेळी योग्य भूमिका मांडलेली आहे. त्यांचे यात काहीही चुकलेले नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही पाटील म्हणाले.