बहुजननामा ऑनलाईन – सप्टेंबर महिन्यापासून इमारतींमधील रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळं आता सील इमारतींवर निर्बंध अधिक वाढवण्यात येणार आहेत. इमारतीतील येण्या जाण्यावर निर्बंध आणले जाणार आहेत. सील इमारतींमधील चाचणी करण्यासोबतच मुंबईतील चाचण्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. या बैठकीत सील इमारतींचा आढावा घेण्यात आला आहे. सुरुवातीच्या काळात इमारतीत एक रुग्ण आढळला तरी पूर्ण इमारत सली केली जात होती. तर इमारतीतील वावरावरही निर्बंध आणले जात होते. मात्र जुलै महिन्यापासून कोविडचा संर्सग नियंत्रणात आल्यानंतर मात्र रुग्ण सापडलेला मजला अथवा विंग सील केली जाऊ लागली. मात्र सप्टेंबर महिन्यात पुन्हा इमारतीत रूग्ण वाढू लागले. त्यामुळं एका इमारतीत 10 पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील केली जाऊ लागली. त्याचबरोबर इमारतीतील वावरावरही निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी नियमावलीही तयार केली जाण्याची शक्यता आहे अशी माहिती आहे.
मुंबईत एवढ्या इमारती सील
सध्या मुंबईतील 10,235 इमारती सील आहेत. त्यात 10 लाख 50 हजार नागरिक रहात आहेत. तर 666 वस्त्या प्रतिबंधित आहेत. या वस्त्यांमध्ये 31 लाख 90 हजार नागरिक आहेत.
सील इमारतीमधील सुरक्षारक्षक, लिफ्टमन, सफाईकामगार तसेच इतर कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करण्याचे निर्देश आयुक्तींनी दिले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक प्रभागातील चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी सहाय्यक आयुक्तांनी नियोजन करण्याचे आदेशही आयुक्तानी दिले आहेत.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’
सर्वेक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी उपायुक्तांवर सोपवण्यात आली आहे. सध्या खासगी डॉक्टरांकडून या मोहिमेला विरोध होत आहे. तर राजकीय पक्षाकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळं काही व्यक्तींची नेमणूक करून या मोहिमेचं नियोजन करावं असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत असं समजत आहे.
रुग्णालयांवर कारवाई
नागरिकांना कोविड रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती उपलब्ध होण्यासाठी डॅशबोर्ड तयार केला आहे. परंतु काही रुग्णालयांकडून वेळीच माहिती उपलब्ध होत नसल्याबद्दल आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळं माहिती अपडेट न करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
विना मास्क कारवाई वाढवा
सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांकडून 200 रुपये दंड घेतला जात आहे. आता ही कारवाई अधिक वाढवण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.