बहुजननामा ऑनलाईन – वाराणसीत रोटी बॅंक सुरु करून हजारो गोरगरीबांचे पोट भरवणारे सामाजिक कार्यकर्ते किशोरकांत तिवारी यांचे गुरुवारी (दि. 15) कोरोनामुळे निधन झाले. दोन दिवसापूर्वी तिवारी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याने त्यांना रविंद्रपुरी येथील रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
तिवारी यांनी 2017 मध्ये वाराणसीमध्ये रोटी बँक सुरू केली होती. आपल्या सहकाऱ्यांसह शहरातील लग्न कार्यात किंवा अन्य कोणत्या कार्यांत उरलेले अन्न जमा करून शहरातील विविध भागातील गरीबांना वाटत होते. काशीमध्ये कोणीही उपाशी राहू नये असा विचार करत त्यांनी लोकांच्या मदतीने ताज जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरही सुरू केले होते. रोटी बँकने गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये हजारो लोकांना दोन वेळेचे जेवण देऊन पोट भरले होते.