पुणे: Rohit Pawar | पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) १० पैकी ८ उमेदवार निवडून आले. तर काही उमेदवार पिपाणी आणि तुतारीच्या साधर्म्यामुळे पराभूत झाले. आता लोकसभेनंतर आगामी विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Assembly Elections 2024) तयारी सुरु झाली आहे.
दरम्यान आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना काही गंभीर आरोप केलेले आहेत. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने (BJP) सर्व प्रकारचे प्रयत्न केले. विरोधी पक्षाच्या नेत्यांना विविध अमिष दाखवण्यात आली. त्याला काही नेते बळी पडले अशी धक्कादायक माहिती रोहित पवार यांनी दिली आहे.
या सर्वांची माहिती आपल्याकडे आहे. ती पुराव्यासह सर्वांसमोर ठेवू असेही त्यांनी सांगितले. मात्र हे नेते कोण होते हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवले. ज्या पक्षानेच कुटुंब फोडली, पक्ष फोडले, त्याच भाजपने निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर केला. स्थानिक नेत्यांवर दबाव टाकला. मोदींची सत्ता येईल. त्यामुळे भविष्यात आपल्यालाही काही फायदा होईल असा विचार करणारा एक गटही विरोधकांमध्ये होता.
असे नेते रात्रीच्या अंधारात जाऊन भाजपच्या नेत्यांना भेटत होते असेही ते म्हणाले. काहींनी ऐडजेस्टमेंट केली. काहींना मॅनेज केले गेले. त्यांना पैसेही पुरवले. हे करत असताना गुंडांचा सर्रास वापर झाला. त्यांना प्रचारात वापरले गेले. त्यांच्या माध्यमातून अनेकांना धमकावले गेले असा आरोपही रोहीत पवार यांनी केला.
शरद पवारांच्या नेतृत्वात एक नवी फळी उभी राहात आहेत. ज्यांच्यावर आरोप झाले ते सर्व आता एका बाजूला गेले आहेत. त्यामुळे ज्यांनी अडचणीच्या वेळी साथ दिली, निष्ठा दाखवली अशा कार्यकर्त्यांना आता पुढे आणण्याची गरजही रोहित पवार यांनी बोलून दाखवली.