पुणे: Ravindra Dhangekar | पुण्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसात शहराच्या विविध भागात पाणी साचले होते. त्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती. यावरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. पुण्यातील रस्त्यांवर पाणी साचण्याला पुणे महानगरपालिकाच जबाबदार असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. (Pune Rains)
एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत त्यांनी हा आरोप केलेला आहे. धंगेकर म्हणाले, “एका दिवसाच्या पावसात स्मार्टसिटीची (Pune Smart City) अक्षरशः दाणादाण उडाली आहे. सर्वच रस्त्यांवर पाणी साचले आहे. प्रत्येक पुणेकर ट्रॅफिकमध्ये अडकला आहे.
पुढच्या ५० वर्षांचा विचार करून केलेला विकास तातडीने पाण्याखाली गेला आहे. प्रामाणिकपणे टॅक्स भरून आमच्या नशिबी पुन्हा हाल अपेष्टाच आल्या आहेत”, अशी टीका रवींद्र धंगेकर यांनी केली. तसेच “पुणेकरांनो तुम्ही कुणाला जाब विचारायच्या भानगडीत पडू नका, कारण ‘पाऊसच जास्त झाला’ असे त्यांचे नेहमीचे उत्तर ठरलेले आहे”, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्याशी दूरध्वनी वरून सविस्तर माहिती घेतल्याचे तसेच याबाबत प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले.