पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पतीबरोबर झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून आत्महत्या(Suicide) करण्यासाठी खाणीत उडी टाकलेल्या आईला वाचवताना दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत ज्या आईला वाचवण्यासाठी मुलांनी पाण्यात उडी घेतली, त्या आईला मात्र पतीने सुखरूप बाहेर काढले आहे. पिंपळी (ता. बारामती ) येथे शनिवारी (दि. 29) पहाटे ही दुर्दैवी घटना घडली आहे. आईला वाचविण्याच्या प्रयत्नात दोन चिमुकल्यांचा झालेला शेवट अनेकांच्या मनाला चटका लावून गेला आहे.
दिव्या (वय 4) आणि शौर्य अतुल सुर्यवंशी (वय 2 रा. पिंपळी, ता. बारामती) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल सूर्यवंशी आणि अंजली सूर्यवंशी या नवरा-बायकोचे शनिवारी पहाटे भांडण झाले होते. त्यामुळे अंजली सुर्यवंशी या रागाच्या भरात आत्महत्या करण्यासाठी पिंपळी येथील खाणीच्या पाण्यात उडी मारली. मात्र, याच वेळी आईला पाहण्यासाठी त्यांची दोन मुले दिव्या आणि शोर्य हे दोघेही पाठोपाठ आले होते. आईला वाचवण्याच्या प्रयत्नात ही दोन्ही मुले एकापाठोपाठ पाण्यात पडली. याचवेळी पती अतुल यांनी पत्नीला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेत तिला पाण्याबाहेर काढले. पण या तणावात दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेनंतर या दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते.