बहुजननामा ऑनलाइन टीम –
पुणे ः प्रतिनिधी
आता कचरा गाड्या अडवायच्या नाहीत, फोडायच्या नाहीत, पालिकेत कचरा टाकायचा नाही, सार्वजनिक ( Corporator Yogesh Sasane)मालमत्तेचे नुकसानही करायचे नाही, तर पुणे महापालिकेतील सत्ताधारी आणि पालिकेचे अधिकाऱ्यांच्या सोसायटीमध्ये कचरा नेऊन टाकणार असल्याचा निर्वाणीचा इशारा नागरिकांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी प्रशासनाला दिला आहे.
रामटेकडी येथील कचरा प्रकल्प नसून, ओपन डंपिंग होत असल्याबाबतची माहिती त्यांनी आज (गुरुवार, दि. 7) सकाळी पत्रकारांना दिली. यावेळी हडपसरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ससाणे म्हणाले की, उरुळी देवाची, फुरसुंगी, हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट, रामटेकडी इंडस्ट्रीयल इस्टेट येथे कचरा डेपो असून, मुंढवा-केशवनगरमध्ये कचरा प्रकल्प होऊ घातला आहे. पुणे शहराचा कचरा टाकण्यासाठी फक्त हडपसरच आहे. त्यामुळे पुणे शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हडपसरची ओळख आता कचराडेपो करायची का, शहरवासियांनो तुमचे आरोग्य चांगले राहू, हडपसरची जनता मेली तरी तुम्हाला त्याचे सोयरसुतक नाही. हडपसरमध्येसुद्धा माणसंच राहतात, त्यामुळे आता हडपसरवासिय जनता पेटून उठली आहे. कचरा प्रकल्पावर एकही कचऱ्याची गाडी येऊ न देण्याचा निर्धार केला आहे. कचरा प्रकल्प म्हणून सांगितले गेले आहे. मात्र, तेथे ओपन डंपिंग करून हजारो मेट्रिक टन कचरा साठवला गेला आहे. त्यामुळे इंडस्ट्रीयल इस्टेटमधील कामगार आणि या परिसरात राहणाऱ्या नागरिकांबरोबर शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उरुळी देवाची आणि फुरसुंगीमधील नागरिकांनी ओपन डंपिंगला विरोध केल्यानंतर तेथे कचरा नेला जात नाही. रामटेकडी येथील प्रकल्पामध्ये कचऱ्याचा भुगा करून तो तेथे नेऊन टाकला जात आहे. या कचऱ्यामध्ये 90 टक्के प्लास्टिक असल्यामुळे त्याचे खत होऊ शकत नाही. शेतामध्ये टाकला तर, शेती नापिक बनत आहे. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये कचऱा डेपोमधील कचऱ्यातील पाणी जमिनीमध्ये मुरत असल्याने परिसरातील स्वच्छ पाण्याचे स्रोत खराब झाले आहेत. त्यामुळे आता हडपसरवासियांच्या वतीने एक पाऊल पुढे टाकून कचरा पालिका सत्ताधिकाऱ्यांच्या आणि पालिका अधिकाऱ्यांच्या सोसायटीमध्ये नेऊन टाकण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. आता तरी पालिका अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांनी प्रकल्पाविषयी तातडीने पावले उचलावीत. प्रत्येक प्रभागामध्ये कचरा जिरविण्याची प्रक्रिया उभारावी, असे आवाहन ससाणे यांनी केले आहे.
कचऱ्याचे विलगीकरण होत नाही
शहरवासियांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करून द्यावा, यासाठी प्रत्येक घरची दोन बकेटचे वाटप केले आहे. तरीसुद्धा कचरा एकत्र करून दिला जात आहे. कचऱ्यामध्ये प्लास्टिकचे प्रमाण जास्त आहे. कपडे, कचरा कुजतो मात्र, प्लास्टिक कुजण्यासाठी 350 वर्षांचा कालावधी लागत असल्याचे अभ्यासकांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. प्लास्टिकचा वापर करणाऱ्यावर पालिकेचा स्वतंत्र विभाग कार्यरत आहे, तरीसुद्धा एवढा मोठा प्लास्टिकचा कचरा येतो कसा, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. पालिकेचे अधिकारीच निष्करीय झाले आहेत, त्यामुळे ही परिस्थिती ओढवली असल्याचा टोला नागरिकांनी अधिकाऱ्यांना लगावला.