बहुजननामा ऑनलाइन टीम – उद्यान विभागाने मेंटेनन्सच्या निविदा काढण्यास प्रचंड विलंब केल्याने शहरातील उद्यानातील वृक्षवल्ली सुकून चालली आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे गटनेते वसंत मोरे(trees in the park) आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांनी आज स्थायी समिती च्या बैठकीतच सुकलेली शोभेची झाडे आणून आंदोलन केले.
वसंत मोरे यांनी सांगितले की, कोरोना मुळे लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर शहरातील सर्व उद्याने बंद करण्यात आली. मार्चपासून अगदी दासऱ्यापर्यंत उद्याने बंदच ठेवण्यात आली होती. दरम्यानच्या काळात उद्यानांच्या देखभालीची टेंडर्स संपली होती, मात्र नवीन निविदा काढण्यात आल्या नाहीत .
या कालावधीत चांगला पाऊस झाल्याने उद्यानातील शोभिवंत झाडे जगली मात्र पावसाळा संपल्यानंतर पाणी न मिळाल्याने ती सुकू लागली आहेत. मी माझ्या प्रभागातील अहिल्यादेवी होळकर उद्यान, सावित्रीबाई फुले अभ्यासिकेलगतचे ऑलिव्ह उद्यान आणि साईनाथ बाबर यांच्या प्रभागातील स्व. पोपटराव लोणकर उद्यानामध्ये आम्ही काही काळ टँकर ने पाणी दिले. तसेच उद्यान विभागाकडेही पाठपुरावा केला. परंतु उद्यान विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. उद्यानात गवत वाढले आहे. पाणी नसल्याने हजारो रुपये खर्च करून शोभिवंत झाडे, फुलझाडे सुकून गेली आहेत. किमान ज्या निविदा उघडल्या असतील त्या ठेकेदारांना तातडीने काम करण्यास सांगावे. दोन दिवसांत याबाबत पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दोन दिवसांत उद्यानातील सर्व कामे सुरू करण्यात येतील, असे आश्वासन दिल्याचे मोरे यांनी नमूद केले.