पुणे : बहुजननामा ऑनलाईन – म्युकरमायकोसिसचा धोका कोरोनातून बरे झालेल्या गंभीर रुग्णांना निर्माण झाला आहे. परंतु, अनेकांना त्याची लक्षणं त्वरित लक्षात येत नाही. परिणामी उपचारास उशीर होतो, अशा रुग्णांना शोधून त्यांच्यावर वेळेत उपचार करण्यासाठी महापालिका व जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. ही शोधमोहिम २८ मेपासून सुरू होणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत फोन केले जाणार आहेत. १ एप्रिलनंतर कोरोनातून बरे झालेल्या गंभीर रुग्णांना महापालिका प्रशासन फोन करून चौकशी करणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सर्वेक्षण येत्या २७ मेपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. जिल्हा परिषदेतर्फे तीन दिवसांत सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे.
दरम्यान, स्मार्ट सिटीच्या कॉल सेंटरमधून या रुग्णांना फोन केले जातील. लक्षणे आहेत का, हे शोधण्यासाठी प्रश्न विचारले जाणार आहेत. सर्वेक्षणासाठी प्रश्नावली तयार केली आहे. जर लक्षणे आढळून आली तर त्यांना तपासणीसाठी कमला नेहरू रुग्णालयात बोलावून कान, नाक, घसा व नेत्र तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाईल. जर लक्षणे असतील या रुग्णांवर दळवी रुग्णालयात उपचार सुरू केले जाणार आहेत.
दीर्घकाळ ऑक्सिजनवरील उपचार, सहव्याधी, किडनी व यकृताचे जुने आजार, उपचारासाठी दीर्घकाळ उच्चप्रितजैविकांचा वापर, रुग्णाला दीर्घकाळ नळीद्वारे अन्नाचा पुरवठा करणे अनियंत्रित मधुमेह, स्टरॉईडच्या वापरामुळे प्रतिकारशक्ती कमी होणे, इम्युनोमॉड्युलेटर औषधांचा उपचारात वापर करणे. दीर्घ काळ अतिदक्षता विभागात उपचार चालू असणे, आदी प्रमुख कारणांमुळे म्युकरमायकोसिस हा आजार होऊ शकतो, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी या सर्वेक्षणाबाबत काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील संशयित रुग्णांचा शोध घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. लवकर निदान झाल्यास हा आजार बरा होऊ शकतो.
– आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
कोणते आहेत प्रश्न…
दात, डोळे, डोके दुखण्याचा त्रास आहे का?
डोळ्यावर सूज आहे का?
दिसण्यात फरक आहे का?
चेहऱ्यावर एका बाजूला सूज व रंग बदलला आहे ?
किती दिवस व किती प्रमाणात स्टेरॉईड देण्यात आले ?
मधुमेहचा त्रास आहे का ?
किती दिवस व्हेंटिलेटर/आयसीयूमध्ये होतात?