नवी दिल्ली: वृत्तसंस्था – गेल्या वर्षीच्या कोरोना संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच शुक्रवारी (दि. 26) दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. पंतप्रधान मोदी ढाका विमानतळावर उतरल्यानंतर त्यांना 19 तोफांची सलामी दिली जाणार आहे. यादरम्यान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी पंतप्रधान मोदी हे विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. शेजारील मित्र देश बांगलादेशासोबत भारताचे दृढ संबंध आहेत. यामुळे या दौऱ्याबाबत आनंदी असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी यांची शेख हसिना यांच्यासोबत व्हर्च्युअली मीटिंग झाली होती. त्यावेळीच या दौऱ्याची घोषणा केली होती.
पंतप्रधान मोदी यांचे विमान सकाळी 10.30 वाजता ढाकामधील हजरत शाह जलाल इंटरनॅशनलवर विमानतळावर लॅन्ड होईल. त्यावेळी पंतप्रधान शेख हसिना पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी तिथे उपस्थित राहतील. यावेळी पंतप्रधान मोदी यांना 19 तोफांची सलामी आणि गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार आहे. त्यानंतर विमानतळावर परेडच निरीक्षण करून दोन्ही देशांचे पंतप्रधान एकत्र सोबत सलामी मंचावर जातील, अशी माहिती देण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी 27 मार्चला बांगलादेशातील गोपालगंज येथे मतुआ समाजाचे धर्मगुरू हरिचंद्र ठाकूर यांच्या जन्मस्थळाला तसेच इतर काही तीर्थ स्थळांना भेट देणार आहेत. मोदींच्या या दौऱ्यादरम्यान पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी आणि बांग्लादेशच्या ढाका या दोन शहरांदरम्यानच्या रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.