मुंबई: PM Narendra Modi-NDA Meeting | लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्याबरोबरच एनडीए आणि इंडिया आघाडी यांनी आपआपल्या स्तरावर मित्रपक्षाशी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी ४०० चा आकडा पार करण्याचा नारा दिला होता.
मात्र देशभरात भाजप २७२ चा मॅजिक आकडा पार करु शकली नाही. भाजप स्वबळावर सरकार स्थापन करू शकणार नाही. जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपाला मित्रपक्षांची गरज भासणार आहे. भाजपच्या नेतृत्त्वाकडून तेलुगू देसम पार्टी आणि नितीश कुमार यांच्याशी बोलणी केली जाऊ शकतात.
इंडिया आघाडीच्याही हालचाली वाढलेल्या आहेत. इंडिया आघाडी एनडीएतील खासदारांची किंवा मित्रपक्षांची तोडफोड करू शकते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा आजच केला जाऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे. एनडीएची दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीला सर्व मित्रपक्षांच्या प्रमुखांना बोलावण्यात आले आहे.
या बैठकीमध्ये एनडीएचा नेता किंवा संयोजक निवडला जाईल. आजच सत्ता स्थापनेचा दावा करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीमध्येच राष्ट्रपतींना दिल्या जाणाऱ्या पत्रावर मित्रपक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सह्या घेतल्या जाणार असल्याचीही माहिती आहे. आणि त्यानंतर हे पत्र आजच संध्याकाळी राष्ट्रपतींना दिलं जाणार आहे.
त्यानंतर राष्ट्रपतींना बहुमताचा आकडा सांगण्यात येणार आहे. राष्ट्रपतींकडून लगेचच एनडीएला सत्ता स्थापनेचं निमंत्रण मिळू शकते. त्यानुसार येत्या ८ जूनला मोदी सरकारचा शपथविधी होऊ शकतो. १० जूनपासून नरेंद्र मोदी ५ ते ६ दिवसांच्या विदेश दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे त्याआधी शपथविधी व्हावा यासाठी एनडीए कडून प्रयत्न सुरू आहेत.