बहुजननामा ऑनलाइन – रविवार आणि सोमवारसाठी मुंबईसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच सोमवारी मुंबईसह संपुर्ण कोकण परिसराला ऑरेंज अलर्ट दिला आहे. मच्छिमारांनी या कालावधीत मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन भारतीय हवामान विभागाने केले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात हा विशेष बदल झाल्याचे सांगण्यात आले.
हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे की, 11 ऑक्टोबर रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. 12 ऑक्टोबर रोजी विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. तर 13 ऑक्टोबर रोजी विदर्भ, मराठवाडा, कोकण, गोव्यात मुसळधार पाऊस पडेल. तर 14 ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोव्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या कालावधीत ताशी 70 किमी वेगाने वारे वाहतील. शिवाय समुद्र खवळेला असेल. यामुळे मच्छिमारांनी समुद्रात मोसमारीसाठी जाऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
मुंबई, पुण्यात पाऊस आणि गडगडाट
दरम्यान, हवामानात विशेष बदल होत असल्याचे आज शनिवारी मुंबईसह पुण्यातही जाणवले. आज सकाळी मुंबई आणि पुणे होते आकाश स्वच्छ होते. तसेच सकाळपासून रखरखीत ऊनं पडले होते. परंतु, दुपारी दोन ते तीननंतर मुंबई शहर आणि उपनगरात ढग दाटून आले होते. गडगडाट सुरु होता. चार वाजताच्या सुमारास काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला. तर पुण्यात मात्र, सायंकाळी पावसाने चांगलाच काळोख केला होता. काहीवेळानंतर वीजांच्या कडकडाटास अनेक ठिकाणी जोरदार पाऊसही पडला.