बहुजननामा ऑनलाइन टीम – बेदम मारहाण करून प्रेमी युगलाची हत्या करण्यात आली. त्यानंतर ही आत्महत्या असल्याचे भासवण्यासाठी दोघांचेही मृतदेह झाडावर लटकवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उत्तरप्रदेशातील मीरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
हल्लेखोरांनी प्रेयसी आणि प्रियकराला प्रेम करण्याची अशी शिक्षा दिली की, लोकांच्या मनात भिती बसेल. त्यांनी आधी दोघांना मरेपर्यंत मारहाण केली आणि नंतर दोघांचे मृतदेह झाडावर लटकवले. अम्बपूर गावात ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच एसएसपी रोहित सिंह यांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. ते म्हणाले की, फॉरेन्सिक टीमने पुरावे जमा केले. प्राथमिक पाहणीत ही हत्येची घटना वाटते. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. लवकरच आरोपींना अटक करून प्रकरणाचा खुलासा करण्यात येईल.
बीए च्या वर्गात शिकणारा विद्यार्थी दिव्यानंद वडिलांच्या मृत्यूनंतर शेतात मोलमजुरी करून आपला परिवार सांभाळत होता. गुरुवारी (दि. 28) दुपारच्या वेळी दिव्यानंद त्याच्या गव्हाच्या शेतात पाणी देत होता, त्यावेळी त्याच्या शेजारी राहणारी इयत्ता अकरावीत शिकणारी प्रेयसी त्याला भेटण्यासाठी शेतात आली. दोघेही शेताच्या धुऱ्यावर बसून बोलत होते. अचानक मुलीच्या परिवारातील लोकांनी दोघांना एकत्र पाहिले. त्यानंतर त्या दोघांनाही बेदम मारहाण केली, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमने पहिल्या नजरेतच आरोपींचा खेळ पकडला. तसेच तरुणाच्या कुटुंबियाने मुलीचे वडील तेजराम आणि त्याच्या साथीदारांवर हत्येचा आरोप लावला असून तशी तक्रार दिली आहे. तर मृत तरूणाच्या पुतण्याने ही घटना होताना डोळ्याने पाहिले आहे.