बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत असून, वाढती रुग्णाची संख्या पाहता राज्य शासनाकडून काही शहरात निर्बंध लागू केले आहे. तर मुंबईत लॉकडाउन करणार का? याबाबत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सूचक विधान केलं आहे. कडक लॉकडाउन लावायला लावू नका, असं मुख्यमंत्री सांगत असूनही कोरोना नियमांचं उल्लंघन नागरिकांकडून होत आहे. परंतु सध्या तरी मागील वर्षाप्रमाणे कडक लॉकडाउन लागणार नाही, असं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या विधानावरून स्पष्ट होत आहे.
तर याबाबत पालकमंत्री शेख म्हणाले, मुंबईत लाॅकडाउन सारखे नियम प्रथम जिथ रुग्ण आढळतात ती सोसायटी कंटेन्मेंट झोन करून मग गरज पडली तर नियम कडक करू असे ते म्हणाले. तर मुंबईत कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने टप्प्याटप्प्याने ताळेबंद लावावा लागेल, असे संकेत देखील दिले आहेत. राज्यात कोरोना वाढतो तसाच मुंबईत वाढतो पण आम्ही सगळे परिस्थिती लक्ष ठेवून आहेत. मुंबई शहरात परत काही ठिकाणी रुग्ण वाढत असल्याचे लक्षात घेत जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सुरू करतो आहोत. यासंदर्भात महापालिका हाॅस्पिटलची तयारी पूर्ण झाली आहे. रुग्णालयात बेड शिल्लक आहेत, पण खासगी रुग्णालयात गर्दी जास्त केली जात आहे, असे पालकमंत्री शेख यांनी सांगितलं आहे.
पुढे शेख म्हणाले, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये रात्री उशिरापर्यंत पब डिस्को, रात्री उशिरापर्यंत हाॅटेलांमध्ये गर्दी दिसत आहे. त्यामुळे मुंबई पालिकेने आणि पोलिसांनी याबाबत कारवाई करत आहे. तसे आदेश दिले गेले आहेत. आता पुढ म्हणजे निर्बंध कडक केले जातील, असे ते म्हणाले, तसेच सार्वजनिक वाहतुकीमुळे रुग्णांची संख्या जास्त वाढत आहे , लोकल किंवा बेस्ट, एसटी बसमध्ये गर्दी आहे. हे खरंय. मात्र सध्या मुंबईत रुग्ण आढळतात ते मोठ्या सोसायटीतून. हे लोक लोकल प्रवास करणारे किती हा विचार केला पाहिजे. उच्चभ्रू सोसायटी आणि प्रभाग अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आहे. तसेच तुलनेने झोपडपट्टी आणि मध्यमवर्गीय भागांमध्ये रुग्णसंख्या तितकीशी वाढलेली नाही. त्यामुळे लोकल बेस्ट एसटी सेवा याबाबत त्वरीत बंद करणे ही मागणी योग्य नाही असं त्यावेळी पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितलं आहे.