मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांची हत्या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथक (एटीएस) करत आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक केली असून निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेचाही यामध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आला असून मनसुख हिरेन यांची ज्यावेळी हत्या करण्यात आली त्यावेळी सचिन वाझेही तेथे उपस्थित असल्याचे समोर आले आहे. मनसुख यांचा मोबाईल आणि सिमकार्डची वाझेनेच विल्हेवाट लावल्याची शक्यता एटीएस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास एनआयएकडे आहे. मात्र तत्पूर्वी एटीएसने केल्या तपासात या हत्येचा बऱ्यापैकी घटनाक्रम समोर आला आहे. एटीएसने जमविलेल्या पुराव्यांवरून मनसुखला बेशुद्ध करून त्यानंतर श्वास रोखून त्यांची हत्या करण्यात आली. ज्यावेळी हि हत्या करण्यात आली त्यावेळी अगदी जवळच एका कारमध्ये बसून वाझे हे सर्व पाहत होते. घटनेदरम्यानचे मोबाईल लोकेशन तपासून सबळ पुरावे गोळा केले आहेत. एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या पाच रुमालांनी मनसुख यांचा चेहरा बांधला होता त्या रुमालांवर क्लोरोफॉर्म टाकण्यात आले होते. आरोपींना श्वास रोखून मारल्यानंतरही मनसुखच्या मृत्यूबाबत शंका होती. त्यामुळे त्यांनी त्याला खाडीत फेकून दिले.
बारमध्ये छापा टाकल्याचे नाटक
रात्री १० च्या सुमारास मनसुख यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर वाझे रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मुंबईत आले. डोंगरी येथील टिप्सी बारमध्ये छापा टाकण्याचे मध्यरात्री नाटक केले. तशी नोंदही पोलीस ठाण्यातील डायरीत केली. टिप्सी बारच्या सीसीटीव्हीमध्ये वाझे यांनी छापा टाकल्याचे पुरावे सापडले. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी मनसुखच्या मोबाईलमध्ये असणाऱ्या दोन्ही सिमकार्डची सीडीआर काढले. त्यामध्ये हत्येनंतर शेवटचे लोकेशन वसई दिसावे यासाठी तिथे नेऊन मोबाइल काही वेळासाठी सुरू करून नंतर त्याची विल्हेवाट लावल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.