बीड: Manoj Jarange Patil On Vidha Sabha Election | लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. यामध्ये महायुतीचा भ्रमनिरास झाला आहे तर इंडिया आघाडीला राज्यात चांगल्या जागा मिळालेल्या आहेत.
राज्यातल्या काही जागांवर मनोज जरांगे फॅक्टर चालल्याचेही बोलले जात आहे. विशेषतः जालना, बीड अशा जागांवर महायुतीच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.
एकूणच लोकसभा निवडणुकीच्या निकालावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “”यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आम्ही कोणाचाही प्रचार केला नाही किंवा कोणाला पाडाही म्हंटलो नाही.
परंतु विधानसभा निवडणुकीत आम्ही ठाम राहणार आहोत. कोणाला पाडायचं तेही थेट सांगणार आहोत. मराठ्यांची खरी किंमत या निवडणुकीच्या निमित्तानं दिसून आली. मराठा आरक्षण मिळावं यासाठी आम्ही संघर्षाला तयार आहोत,” मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मनोज जरांगे पुढं म्हणाले की, “निवडून कोणीही येऊ द्या. आम्हाला त्याची काही देणंघेणे नाही. पण या सत्ताधाऱ्यांना या मराठ्यांनी खाली खेचलं आहे, हे मात्र निश्चित. महाविकास आघाडी निवडून येऊ द्या की, महायुती आघाडी निवडून येऊ द्या.
आम्ही राजकारण करणार नाही. करतही नाही. हा फक्त मी एवढं म्हटलं होतं की आपल्याला विश्वासात न घेणाऱ्यांना पाडा. पण कोणाला पाडा आणि कुठे पाडा हे मात्र म्हटले नव्हतं.
कारण आम्हा गोरगरीब मराठ्यांचं भवितव्य या राजकारण्यांनी सर्व धुळीत मिळवलं आहे. त्यामुळे मराठ्यांनी हे मतदानाच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे.”