दिल्ली: Mamata Banerjee | आज नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा शपथविधी होणार आहे. मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत. भाजपला यंदा बहुमत न मिळाल्याने त्यांना मित्रपक्षासोबत सरकार स्थापन करावे लागणार आहे. या दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मोठा दावा केला आहे.
इंडिया आघाडीने (India Aghadi) आज सरकार स्थापनेचा दावा केला नसला तरी उद्या ते तसे करणार नाही असे नाही. आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या , “आज सरकार स्थापनेचा दावा केला नाही, म्हणजे उद्याही करणार नाही असं होत नाही. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार आमचेही मित्र आहेत”, असं ममता बॅनर्जी यांनी म्हंटले आहे. कालिघट निवासस्थानी तृणमूलच्या २९ खासदारांची ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली. तसंच, एनडीए सरकार १५ दिवसही टिकणार नाही, असं म्हटलं.
त्या पुढे म्हणाल्या की, “देशाला बदल हवा आहे. हा जनाधार परिवर्तनासाठी होता. आम्ही वाट पाहतोय. परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. हा जनादेश नरेंद्र मोदींच्या विरोधात आहे. त्यामुळे ते यावेळी पंतप्रधान व्हायला नको होते. दुसऱ्याने जबाबदारी घ्यायला हवी होती. भारतीय जनता पक्ष (भाजप) अलोकतांत्रिक आणि बेकायदेशीर पद्धतीने सरकार स्थापन करत आहे.’ असेही त्यांनी सांगितले.