पुणे बहुजननामा ऑनलाईन- सध्या सत्तेत असणारे भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत नसून विमा कंपन्यांच्या फायद्यासाठीच सरकार धोरण राबवत आहे. पीक विमा कंपन्यांच्या नफेखोरीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नुकसानीचा परतावा मिळत नाही,यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. पंतप्रधान पीक विमा योजना आढावा बैठकीत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
पुणे विद्यापीठ रस्त्यावरील वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थेत बुधवारी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची आढावा बैठक आयोजित केली होती.त्यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत बोलत असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सौरभ वळवडे, सूरज पंडीत, पूजा झोळ यांच्यासह पाच ते सहा कार्यकर्त्यांनी पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करुन घोषणा दिल्या. त्यामुळे काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलीसांनी आंदोलकांना बाहेर काढल्यानंतर कार्यक्रम पुन्हा सुरु झाला.
कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी याचा समाचार घेताना कोठेही घाण पडली की माध्यमे तेथे धावतात. त्यांनी शेतकºयांना दिल्या जात असलेल्या मिठाईकडे लक्ष द्यावे अशी उपमा देत आंदोलक आणि माध्यमांची खिल्ली उडविली. कृषीमंत्री बोंडे, राज्यमंत्री खोत, महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी, वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे, प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशिष भुतानी, सचिव (कृषी व जलसंधारण) एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुहास दिवसे आणि राज्यातील शेतकरी प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते.