मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या कोणत्याही निकषांत बसत नाही, आरक्षण हे आर्थिक तसेच राजकीय आधारावर देता येत नाही ते सामाजिक मागासलेपणा या गोष्टीसाठी देता येते असे घटनेत नमूद आहे. पण मराठा समाजाच्या मतांवर डोळा ठेवून मागालेपणाचे तकलादू निकष लावून या समाजास आरक्षण दिलेले असल्याने ते पूर्णपणे घटनाबाह्य असल्याचा युक्तिवाद मंगळवारी उच्च न्यायालयात केला गेला.
मराठा समाजास सरकारी नोकऱ्या व शिक्षणात १६ टक्के आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या कायद्याच्या वैधतेस आव्हान देणाºया याचिकांवरील अंतिम सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे सुरू झाली. याचिकाकर्त्या डॉ. जयश्री पाटील यांच्या वतीने त्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी हा युक्तिवाद केला. दुसºया याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद गुरुवारी सुरू होईल.
अॅड. गुणरत्ने यांनी युक्तिवादात तीन मुद्द्यांवर विवेचन केले. त्यांचा पहिला मुद्दा होता, मराठा आरक्षणामुळे राज्यातील आरक्षणाने ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली असून, ती अवैध व घटनाबाह्य आहे. यासाठी त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी १९०२ मध्ये काढलेला आरक्षणाचा आदेश, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनासभेत केलेली भाषणे व सर्वोच्च न्यायालयाने एम. नागराज, इंदिरा सहानीसह अन्य प्रकरणांमध्ये दिलेल्या निकालांचे हवाले दिले.
समानता व सर्वांना समान संधी हे राज्यघटनेचे मूळ तत्त्व आहे. आरक्षण हा त्याला अपवाद आहे. अपवाद हा नियमाहून वरचढ असू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांचा दुसरा मुद्दा होता राज्य मागासवर्ग आयोगाकडून अहवाल घेऊन त्याआधारे मराठा समाजास आरक्षण देण्याचा राज्य सरकारला मुळात अधिकारच नसल्याचा. त्यांचे म्हणणे होते की, स्वातंत्र्यापासून निव्वळ प्रशासकीय फतव्याने सुरू राहिलेल्या केंद्रीय मागासवर्ग आयोगास घटनात्मक दर्जा देणारी १०२ वी घटनादुरुस्ती गेल्या वर्षीच्या १५ आॅगस्टपासून लागू झाली. त्यामुळे राज्य सरकारने आरक्षण देण्यापूर्वी मराठा समाजाच्या मागासलेपणाची तपासणी या केंद्रीय आयोगाकडून करून घ्यायला हवी होती.
मराठा समाजास मागास ठरविताना आयोगाने लावलेले तकलादू व असमर्थनीय निकष हा त्यांचा तिसरा मुद्दा होता. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, मराठा समाज हा कुणबी समाजाच भाग असल्याचे आयोगाने म्हटले आहे. ‘ओबीसी’साठी असलेले आरक्षण कुणबी समाजास लागू असताना, त्यातील मराठ्यांना त्याहून वेगळे आरक्षण कसे काय दिले जाऊ शकते?, असा त्यांचा सवाल होता. आयोगाने शैक्षणिक मागासलेपणात मराठा समाजास पैकीच्या पैकी गुण दिले आहेत. पण अंदमान-निकोबार बेटांवरील आदिवासीही शंभर टक्के अशिक्षित नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
अॅड. सदावर्ते असेही म्हणाले की, आयोगाने अहवालात शेतकरी आत्महत्यांची चर्चा केली आहे. पण त्यातील आकडेवारी पाहता इतर समाजांच्या तुलनेत एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा शेतकºयांचे आत्महत्यांचे प्रमाण सर्वात कमी असल्याचे दिसते. राज्याला १७ पैकी १२ मुख्यमंत्री देणाऱ्या मराठा समाजास आर्थिकदृष्ट्या मागास असे फार तर म्हणता येऊ शकते.