मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांत मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्याने 1 जूनपासून निर्बंध शिथिल होतील, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान मुंबईतील 50 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कडक निर्बंध शिथिल करणे हे म्हणजे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखे असल्याचे विधान मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केले आहे. शेख यांच्या या विधानामुळे निर्बध शिथिल होतील की नाही, याविषयी शंका उपस्थित केली जात आहे.
मंत्री शेख यांनी बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी शेख म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे. साहजिकच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या कडक निर्बंधामुळे सर्व व्यवहार बंद आहेत. आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असेल तर निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी व्यापारी तसेच सर्वसामान्यांकडूनही होत आहे. राज्य सरकारनेही 1 जूनपासून निर्बंध शिथिल करण्याची चाचपणी सुरू केली आहे. मात्र मुंबईतील लॉकडाउन टप्प्याटप्प्याने उठवणे गरजेचे आहे. सलून, हार्डवेअर आणि इतर अत्यावश्यक गोष्टींची दुकाने सुरूवातीला उघडावीत. त्यानंतर बाकीची दुकाने आणि इतर दैनंदिन व्यवहार सुरू करावेत, असे मंत्री शेख यांनी म्हटले आहे.