बारामती : – Lok Sabah Election Results 2024 | लोकसभा निवडणुकीचा आज निकाल जाहिर होत आहे. यामध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. तर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) तीस जागांवर मुसंडी मारली आहे. राज्यातील उमेदवारांची विजयी घौडदौड सुरु असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील जनतेचे आभार, राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय कष्ट घेतले. त्याबद्दल मी त्याची कृतज्ञता व्यक्त करतो. हा निकाल इतर परिवर्तनाला पोषक असा आहे. देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली, सुदैवाने इतर ठिकाणीही चित्र आशादायक आहे, असं शरद पवार म्हणाले.
निकाल जाहीर होत असताना शरद पवार यांनी टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, आज निकाल लागल्यानंतर मी काही नेत्यांशी चर्चा केली. विशेषत: काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे, सीताराम येच्युरी आणि इतर प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. उद्या दिल्लीत बैठक होणार आहे. संध्याकाळपर्यंत आम्हाला निरोप मिळेल. त्यासाठी आम्ही जाऊ, मी चंद्राबाबूंशी बोललो किंवा इतर कुणाशी बोललो यात काही तथ्य नाही, अशा चर्चा आमच्या राष्ट्रीय पातळीवर चर्चा करुन केल्या जातील असे शरद पवार यांनी सांगितले.
सर्व सहकाऱ्यांनी मेहनत
आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रात 10 पैकी 7 जागांवर आघाडीवर आहोत. हे यश फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचं यश आहे, असं मी मानत नाही. काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि आमचे सर्व सहकाऱ्यांनी मेहनत केली त्यामुळे हे यश सगळ्यांना मिळालं. महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेची खबरदारी घेऊ, असेही शरद पवार यांनी सांगितले.
जनतेने परिवर्तनाच्या दिशेने निकाल दिला
लोकसभा निवडणुकांचे सर्व निकाल अद्याप हाती नसले तरी महाराष्ट्राने परिवर्तनाच्या दिशेने निकाल घेतल्याचे स्पष्ट होते. काँग्रेस, शिवसेना (उ.बा.ठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) ह्या महाविकास आघाडीतील घटकांनी सामूहिकरित्या जनतेपुढे आपली भुमिका मांडली. छत्रपती शिवाजी महाराजंचा आदर्श समोर ठेवून शाहू-फुले-आंबेडकरांचा पुरोगामी विचार पुढे नेणे, लोकशाही मुल्यांचे रक्षण करणे ही ती प्रमुख भुमिका होती. जाती-धर्माच्या वादा पलीकडे जाऊन रोजगार, महागाई यासारख्या दैनंदिन भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आघाडी कटिबद्ध होती. ह्या भुमीकेचे जनतेने स्वागत केले, सन्मान राखला आणि महाविकास आघाडीवर विश्वास दाखवला त्याबद्दल मी जनतेचा आभारी असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.