रत्नागिरी/मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – तौक्ते तौक्ते चक्रीवादळाने कोकणाला मोठा फटका बसला आहे. कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागाचा पहाणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी नाही, तर कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी चक्रीवादळग्रस्त भागाचा दौरा करत आहे. हेलिकॉप्टरमधून नाही, तर जमिनीवर उतरुन मी पाहणी करण्यासाठी आलो आहे, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. पाहणी दौऱ्यादरम्यान 1 जून नंतर राज्यातील लॉकडाऊन वाढणार का, यावरही त्यांनी उत्तर दिले.
तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना कधीपर्यंत मदत जाहीर करणार असा प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, पॅकेजवर माझा विश्वास नाही. पण मदतीशीवाय कुणीही वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. रत्नागिरीत आढावा बैठक घेतल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी राज्यातील ब्रेक द चेन आणि लॉकडाऊनसंदर्भात प्रश्न विचारले. त्यावर परिस्थिती पाहून लॉकडाऊनचा पुढील निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट सांगितले.
कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी मी आलो आहे, प्रत्यक्ष पंचनामे झाले की नुकसानीचा अंदाज घेऊन मदतीबाबत निर्णय घेणार, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले.
शेती आणि फळबाग यांचे पंचनामे दोन दिवसांत करण्याचे आदेशही त्यांनी रत्नागिरी येथे बैठकीदरम्यान दिले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 21, 2021
लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोना कमी होतोय हे नक्कीच, पण त्यासंबंधी काही बोलणार नाही. गेल्या लाटेच्यावेळी आपण अनुभव घेतला आहे. गेल्यावेळी आपण कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं. पण, थोडीशी शिथिलता आली अन् कोविड चौपटीने वाढला, असे सांगत त्यांनी राज्यातील लॉकडाऊन वाढवला जाण्याचे संकेत दिले आहेत. तसेच, सध्याचा विषाणू घातक असून वेगाने पसरत आहे. आपण निर्बंध शिथील करु तेव्हा मागील अनुभवातून शाहणं व्हावं लागेल. सध्या परिस्थिती अटोक्यात असून त्यानुसार लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मी फोटोग्राफर आहे, मला फोटोसेशनमध्ये रस नाही
केंद्राच्या निकषाप्रमाणे मदत लगेच सुरु करु. एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे निकष बदलण्यावर अद्याप तरी काही निर्णय झालेला नाही. आतापर्यंत 90 ते 95 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेतला जाईल. सध्या परिस्थितीचा आढावा घेत आहे. कोणत्या निकषांनुसार मदत करायची याचा निर्णय आढवा घेतल्यानंतर घेऊ. माझा दौरा चार तासांचा आहे. मला फोटोसेशन करण्यात रस नाही, कारण मी स्वत: फोटोग्राफर आहे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.