लासलगाव – बहुजननामा ऑनलाईन – लासलगाव सह जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे.तर दुसरीकडे कांदा दरात घसरण सुरू आहे . नवीन लाल कांदा ७ रुपये किलोपासून ते १८ रुपये किलोने विकला जात आहे. परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झाल्याने मिळणाऱ्या दरातून शेतकरी वर्गाचे उत्पादन खर्चही निघत नसल्याने केंद्र सरकारने तत्काळ कांद्यावर लादलेली निर्यात बंदी उठवावी अशी मागणी केली जात आहे.
कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांच्या होत असलेल्या नुकसानीवर शासन गप्प का ? कांद्याचे ठोक विक्री दर ६० रुपये किलोच्या पुढे गेल्यानंतर केंद्र शासनाने कांद्याची निर्यात बंद केली, कांदा साठ्यांवर मर्यादा घातली, परदेशातून कांदा आयात केला व व्यापार्यांवर छापे टाकून कांद्याचे दर पाडले आहेत. मोठ्या प्रमाणात नवीन कांदा बाजारात यायला सुरुवात होताच कांदा दर कोसळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे, कांदा उत्पादक शेतकर्यांच्या हिताचा विचार करून केंद्र शासनाने तातडीने कांदा निर्यात बंदी कायमची उठवावी अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे
सध्या बाजारामध्ये येणारा कांदा हा खरीप हंगामातील असल्यामुळे त्याची साठवणूक करता येत नाही. उत्पादीत होणारा माल लवकर खराब होत असल्यामुळे तो लगेचच विक्री केल्या शिवाय शेतकर्यांना पर्याय नाही.त्यामुळे दररोज कांदा या पिकाचे भाव मोठया प्रमाणात कमी होत आहेत.यावर्षी कांदा बियाणेचा तुटवडा असल्यामुळे व अतिवृष्टीमुळे कांदा रोपांचे प्रचंड मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे.त्यामुळे शेतकर्यांनी मिळेल त्या भावात कांदा रोपे खरेदी केलेले आहेत.म्हणुन यावर्षी अतिवृष्टी व रोगराई मुळे शेतकर्याचा उत्पादन खर्च दुप्पटीपेक्षा अधिक झालेला आहे. त्यामुळे शेतकर्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.त्यातच कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे मार्च २०२० पासुन शेतमालाचे बाजारभावाविषयी अनिश्चितता असल्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आले आहेत. त्यामुळे त्वरीत निर्यात बंदी मागे घ्यावी अशी मागणी जोर धरत आहे.
प्रतिक्रीया – मनोज जैन,कांदा व्यापारी
खरीप हंगामातील कांदा उत्पादकांना भाव पडून मोठा आर्थिक फटका बसत आहे बाजारात खरीप हंगामातील कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झालेली असल्यामुळे मागणीपेक्षा पुरवठा वाढलेला आहे त्यामुळे सध्याची कांदा निर्यात बंदी उठवणे याबाबत केंद्र शासनाने तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.
प्रतिक्रिया – निवृत्ती न्याहारकर,शेतकरी
जिल्ह्यात कांदा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलकांवर टीका करण्यापेक्षा आधी कांद्याचा प्रश्न मार्गी लावा; मग शेतकरी आंदोलनावर बोला.
प्रतिक्रिया – शेखर कदम,शेतकरी कातरणी
जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना दोन पैसे मिळत असताना कांदा निर्यातबंदी करून अन्य देशातील स्वस्त दरात कांदा आयात करून शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान केले. केंद्र सरकार म्हणत २०२२ पर्यंत शेतकरी वर्गाचे उत्पन्न दुप्पट करू मात्र असे शेतकरी विरोधी निर्णय घेतले तर उत्पन्न कसे दुप्पट होईल.