पुणे: बहुजननामा ऑनलाईन – माझ्या नावावर जमीन करून दिली जात नाही, म्हणून मी आत्महत्या करतोय, असे एका व्यक्तीने फोन करून पोलिसांना सांगितले. पोलिस अधिका-याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दाखवलेल्या अचूक प्रसंगावधानामुळे आत्महत्या करणा-याचा जीव वाचला अन् घरगुती तंटादेखील मिटवण्यात यश आले आहे. वालंचदनगर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी याकामी कर्तव्यतत्परता दाखवली आहे.
याबाबतची माहिती अशी की, निंबोडी (ता. इंदापुर) येथील नारायण अनंत घोळवे उर्फ दादा पाटील यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेव्दारे कॉल दिला. माझ्या नावावर जमीन करुन दिली जात नाही म्हणून मी आत्महत्या करीत आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे हा कॉल सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मोबाईलवर आल्याने त्यांनी तत्काळ याची माहिती भवानीनगर दुरक्षेत्राला दिली. तसेच स्वतः पवार यांनी तातडीने भेट घेऊन त्यांची अडचण समजावून घेतली. तसेच अशा आत्मघातकी निर्णय घेऊ नये, म्हणून समजूत काढली. दादा पाटील यांचे व त्याचे पुतणे भाऊसाहेब घोळवे यांच्यांत वडिलोपार्जित 25 गुंठे जमीनीबाबत वाद होता. त्यांच्या कुटुंबीयांसमवेत चर्चा करून यावर तोडगा काढण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक लकडे, सहाय्यक फौजदार बनकर यांनी याकामी कर्तव्यतत्परता दाखवल्याने आत्महत्या करणा-याला जीवदान मिळाले आहे.